
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे हे तीन ऋतू हिंदुस्थानात आपल्याला अनुभवण्याास मिळतात. या प्रत्येक ऋतूची स्वतःची अशी एक खासियत आहे आणि त्यांची खास महतीही आहे. ऋतूबदलाप्रमाणे आपण आपल्या आहारातही बदल करत असतो. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यावर, आपल्या जिभेला चटकमटक पदार्थ खाण्याचे वेध लागतात. पावसाळा हा अनेक चटकदार आणि गरमागरम पदार्थ खाण्याचा सीझन. म्हणूनच पावसाची चाहूल लागताच, अस्सल मासांहरी प्रेमी खेकडे बाजारात कधी येतात याकडे डोळे लावून बसतो.
खेकडे हे आपल्याकडे तिन्ही ऋतूंमध्ये मिळतात. परंतु पावसात खेकडे खाण्याची मजा ही काही औरच असते. मस्त गरमागरम खेकड्यांचा रस्सा भुरके मारुन पिण्यात जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करताच येणार नाही. तो आनंद अनुभवायलाच हवा. पावसाळ्यामध्ये खेकड्यांची पैदास ही मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच बिळामध्ये लपलेले खेकडे पावसाच्या पाण्याने बिळ भरल्यामुळे बाहेर पडतात. पावसाळ्यात म्हणूनच आपल्याला बाजारात मुबलक खेकडे खायला मिळतात.
खेकडा खाणे आपल्या आरोग्यासाठी का गरजेचे आहे?
खेकडा खाणे हे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी फार महत्त्वाचे आहे.
खेकडा खाण्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.
खेकडा हा उर्जेचे भांडार आहे, त्यामुळे आपल्या शरीरास उर्जा मिळण्यास मदत होते.
खेकड्यांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी12 आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात.
खेकड्यामध्ये ओमेगाचे प्रमाण खूप असल्याने, खेकडा आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतो.
खेकडा खाण्यामुळे आपले वजन कमी करण्यासही मोठी मदत होते.