
वारसाहक्काबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. एखाद्या महिलेला माहेरून वारसाहक्काने संपत्ती मिळाली असेल. मात्र मृत्यूपत्र करण्याआधी तिचा मृत्यू झाला तर त्या संपत्तीवर सासरच्यांचा किंवा पतीचा कोणताही हक्क राहणार नाही. ती संपत्ती वडिलांच्या वारसदारांकडे जाईल, असा महत्वपूर्ण निर्वाळा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 च्या कलम 15(2)(अ)च्या आधारे न्यायमूर्ती तरलदा राजशेखर राव यांनी हा निकाल दिला.
हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार एखाद्या हिंदू महिलेला माहेरून वारसाहक्काने संपत्ती मिळाली असेल आणि त्या महिलेला स्वतःचे मूल नसेल, तर मृत महिलेची संपत्ती कायदेशीर तिच्या वडिलांच्या वारसांना मिळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दैनिक जागरण दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील एका मालमत्तेच्या वादाप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने हिंदू उत्तराधिकारी कायद्याबाबत स्पष्टता दिली. एका वृद्ध महिलेने 2002 आपल्या मालमत्तेतून एक हिस्सा आपल्या पहिल्या नातीला भेट म्हणून दिला होता. या नातीला अपत्य नव्हते. तिचा 2005 मध्ये मृत्यू झाला. नातीचा मृत्यू झाल्याने 2012 मध्ये महिलेने बक्षीसपत्र रद्द केले आणि दुसऱ्या नातीच्या नावे ती मालमत्ता केली. यावर पहिल्या नातीच्या पतीने आक्षेप घेतला. याबाबत महसूल विभागाने पहिल्या पतीच्या बाजूने निकाल दिला.
याचिकाकर्त्या नातीने महसूल विभागाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावर न्यायमूर्ती तरलदा राजशेखर राव यांच्यासमोर सुनावणी झाली. मृत पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती मालकी हक्क सांगू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने संपत्तीबाबत आजीने केलेले नवे मृत्यूपत्र कायदेशीररित्या वैध ठरवले.




























































