शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची व्यवस्था वेगवेगळी नसल्यास हॉटेल, उपाहारगृहांवर कारवाई होणार; एफडीए आयुक्त राजेश नार्वेकर यांचे सक्त निर्देश

शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ साठवणे आणि शिजवणे ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांवर कठोर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

प्रक्रिया व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगवेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द करणे, दंड आकारणे अशी कारवाई करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनामार्फत गेल्या वर्षी राज्यातील 30 हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. या वर्षी एक लाख अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तपासण्यांना वेग

z अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन 189 अन्न सुरक्षा अधिकारी 7 जून  रोजी रुजू झाले आहेत. राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात आहेत, असे नार्वेकर यांनी नमूद केले.

अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनांना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.