
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वगडी बाद 465 धावा केल्या असून टीम इंडियाकडे सहा धावांची आघाडी आहे. जसप्रीत बुमराने अचूक मारा करत पाच विकेट घेतल्या. परंतु इंग्लंडला 400 धावांपर्यंतही पोहोचता आलं नसत, जर क्षेत्ररक्षकांनी सहा झेल सोडले नसते. पहिल्या डावात शतक ठोकणारा यशस्वी क्षेत्ररक्षणात अयशस्वी ठरला आणि त्याचा फटका टीम इंडियाला बसला.
टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपली धार दाखवून दिली आहे. परंतु क्षेत्ररक्षकांनी आतापर्यंत सपशेल निराश केलं आहे. यसस्वी जैसवालने या सामन्यात आतापर्यंत तीन झेल सोडले आहेत. यशस्वीने पहिला झेल सलामीला आलेल्या डकेटचा सोडला जेव्हा तो 15 या धावसंख्येवर खेळत होता. झेल सोडल्यानंतर त्याने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर यशस्वीने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर ओली पोपचा झेल सोडला जेव्हा तो 62 धावांवर खेळत होता. झेल सोडल्यानंतर त्याने शतकं ठोकलं. त्यानंतर तिसरा झेल हॅरी ब्रुकचा सोडला जेव्हा तो 82 धावांवर खेळत होता. त्याने 99 धावांची खेळी केली. या तीन झेलव्यतिरिक्त टीम इंडियाचा सर्वात तगडा क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजानेही बेन डकेड आणि स्मिथचा महत्वपूर्ण झेल सोडला. तसेच मोहम्हमद सिराजने हेरी ब्रुकचा झेल सोडला. ज्या खेळाडूंचे झेल सुटले त्यांनीच दमदार फलंदाजी करत इंग्लंडला 465 धावांपर्यंत पोहोचवलं.