IPL 2026 – चिन्नास्वामीत पुन्हा लाल वादळ, आरसीबी पुन्हा घरच्या मैदानावर खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 2026 हंगामासाठी मोठी घोषणा करत घरच्या मैदानावर दमदार पुनरागमन निश्चित केले आहे. संघाचे पाच घरचे सामने पुन्हा एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरच रंगणार आहेत. विविध शासकीय व प्रशासकीय यंत्रणांशी अनेक महिन्यांच्या समन्वयानंतर हा मार्ग मोकळा झाला.

दोन सामने रायपूरमध्ये

पाच सामने बंगळुरू होत असले तरी उर्वरित दोन घरचे सामने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

शासनप्रशासनाचे पाठबळ

बंगळुरूत सामने आयोजित करण्यासाठी कर्नाटक सरकार, (कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना) आणि कर्नाटक पोलिस दल यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आरसीबीने स्पष्ट केले. पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करत सर्र कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे आरसीबीचा आगामी आयपीएल प्रवास घरच्या मैदानावरच होणार आहे.

हीच आमची ओळख, हीच आमची ताकद

‘चिन्नास्वामी स्टेडियम हे आमच्यासाठी केवळ मैदान नाही, तर आमच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. बंगळुरूच्या चाहत्यांची ऊर्जा हीच आमच्या खेळाडूंची खरी प्रेरणा आहे. हीच आमची ताकद आणि आमची ओळख असल्याचे आरसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मेनन यांनी सांगितले.

त्यामुळे घरच्या चाहत्यांच्या जयघोषात विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने आरसीबीचा किल्ला सज्ज झाला आहे. आता लाल वादळ पुन्हा उसळेल, असा विश्वास आहे.