
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात फिल सॉल्ट (78 धावा) आणि विराट कोहली (50 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची आक्रमक भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. विराट कोहलीने 38 चेंडूंत अर्धशतक झळकावले, परंतु 15 व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
सामन्यादरम्यान चाहत्यांना मोठा धक्का बसला जेव्हा विराट कोहली मैदानात दिसला नाही आणि त्याच्या जागी जॅक बेथेल क्षेत्ररक्षण करताना दिसला. समालोचकांनी माहिती दिली की विराटच्या घोट्याला दुखापत झाली आहे. मात्र, सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या यांनी चाहत्यांना दिलासा दिला. दुखापत गंभीर नसल्याचे संकेत देत विराट लवकरच तंदुरुस्त होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सध्या टीम आणि चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आरसीबीचा पुढचा सामना 15 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर आहे. या मधल्या काळात विराट कोहलीला त्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी आणि पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.


























































