
मित्रासोबत गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालन्यात घडली. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (19) असे मयत तरुणाचे नाव आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.
बेसुमार वाळू उत्खननामुळे गोदावरी नदी अधिक खोल झाली आहे. यामुळे ज्ञानेश्वरला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मित्राने गावात धाव घेत गावकऱ्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.
ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या तरुणांनी दोन तास पाण्यात शोध घेतल्यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला. एककुलता एक मुलगा गेल्याने खराद कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर खराद नुकताच बारावी परीक्षा पास झाला होता.