ओहोटी येणारच.. भाजपने लक्षात ठेवावे, राज ठाकरे यांनी सुनावले

ज्या पक्षाने 60 वर्षे देशावर राज्य केले त्या काँग्रेसची अवस्था जरा बघा.. भरतीनंतर ओहोटी येतेच. आज भाजपमध्ये भरती सुरू आहे पण उद्या ओहोटी येणारच हे त्यांनी लक्षात ठेवावे. हा निसर्गाचा नियम आहे, असे खडेबोल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.22 तारखेला मशिदीवरील भोंग्यांचा पुन्हा समाचार घेणार असल्याचे  राज ठाकरे यावेळी म्हणाले. भोंग्यांच्या आंदोलनामुळेच मला अयोध्येत बोलावणे आले. पण मला विरोध करणारे कोण होते, ते ‘हिंदुत्ववादीच’ होते, असा टोलाही राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. सध्या सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राला खड्डय़ात नेणारे आहे. असे गलिच्छ राजकारण मी याआधी कधीच पाहिले नाही, असेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या ऑक्टोबर की मार्च, मार्च की ऑक्टोबर कधी होणार हे पाहताना दहावीत नापास झाल्यासारखे वाटतेय, असा टोलाही त्यांनी लगावला.