
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर नुकत्याच बांधलेल्या गटाराला पहिल्याच पावसात मोठे भगदाड पडले आहे. यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तीव्र संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सर्व्हिस रोडचे काम पावसाळय़ात हाती घेण्यात आल्याने आणि वाहतुकीची कोणतीही योग्य व्यवस्था न केल्यामुळे गरम पाण्याच्या पुंडाजवळ मोठय़ा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, महामार्गाला पडलेल्या जुन्या भेगा रुंदावत चालल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून त्याची गुणवत्ता नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते संगमेश्वरदरम्यान किंबहुना सर्वच ठिकाणी निकृष्ट काम होत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. एप्रिल महिन्यात आरवली येथील सर्व्हिस रोडच्या गटाराचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. त्यावेळी या कामावर योग्य प्रकारे पाणी मारण्यात आले नसल्याने कामाच्या दर्जाबाबत तेव्हाच शंका व्यक्त करण्यात आली होती. या गटाराला तडे गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. आता पावसाळा सुरू होताच येथील सर्व्हिस रोडचे गटार ढासळण्यास सुरुवात झाली असून त्याला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे बाजारात ये-जा करणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे तसेच मोठा धोका निर्माण झाला आहे.
महामार्गावरील भेगांवर तात्पुरती मलमपट्टी
गरम पाण्याच्या पुंडाजवळच महामार्गावर गेल्या वर्षी भेगा पडल्या होत्या. या भेगा बुजवण्याऐवजी त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. आता या भेगा पुन्हा रुंदावत असल्याने महामार्गावरील वाहतूक बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसात काम सुरू, अपघाताचा धोका वाढला
येथील सर्व्हिस रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम पाऊस सुरू झाल्यावर हाती घेण्यात आले आहे. पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र आता पावसात हे काम सुरू केल्यामुळे या बाजूने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने धोकादायक पद्धतीने वळवण्यात आली आहे. गरम पाण्याच्या पुंडाजवळ, चिपळूण आणि रत्नागिरी बाजूने येणाऱ्या भरधाव वाहनांचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.