मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा देण्याची मागणी

मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा केली. मात्र प्रचंड गर्दी असणाऱ्या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे लावल्यास प्रवासी गुदमरून संकट आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे स्वयंचलित दरवाजापेक्षा रेल्वेच्या सेवासुविधा वाढवा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

याबाबत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांना निवेदन दिले. रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणावर पैसे खर्च करण्याऐवजी लोकल ट्रेनची चांगली सेवा देण्याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. स्वयंचलित दरवाजांचा पर्याय व्यवहार्य नसल्याचे अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणले. स्वयंचलित दरवाजे प्रणालीमुळे प्रवाशांची संख्या नियंत्रित होईल. या क्षमता नियंत्रणामुळे अनेक प्रवाशांना इच्छित लोकल पकडता येणार नाही. असे सावंत यांनी म्हटले आहे. यावेळी रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, शाखाप्रमुख जयवंत नाईक उपस्थित होते.

मृतांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्या!

z मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह कुटुंबातील मृत प्रवाशाची पत्नी, मुलगा, मुलगी किंवा भाऊ यांना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्या, अशी मागणीही यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली.

अशा आहेत मागण्या

z दिवा-सीएसटीएम लोकल तातडीने सुरू करा. z कल्याण आणि दिवा-सीएसएमटी लोकलची संख्या वाढवा. z कल्याण ते ठाणे शटल सेवा तत्काळ सुरू करा. z ठाणे ते पनवेल किंवा नवी मुंबई परिसर आणि कल्याण-ठाणे शटल सेवेला जोडणारी शटल सेवा सुरू करा.