देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या अतृप्त नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

Devendra fadanvis chief minister maharashtra

राज्यात शिंदे भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहेत. पालकमंत्र्यांच्या यादीत भाजपने शिंदे गटाला धोबीपछाड देत 21 पालकमंत्री पदं मिळवली आहे. शिंदे गटाला 15 जिल्हे मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद घेतले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस हे राजकिय दृष्ट्या अतृप्त नेतृत्व आहे. कारभार हा लोकांसाठी करायचा असतो, फडणवीस हे सगळं स्वतः साठी करत आहेत. 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद घेऊन सुद्धा “मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून काम करण्यासाठी फडणवीसांना शुभेच्छा”!!, असे ट्विट राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले आहे.

पुन्हा नाराजीनाटय़

मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित खाते न मिळाल्याने मंत्र्यांमध्ये जशी नाराजी निर्माण झाली आहे तशीच नाराजी अपेक्षित जिल्हा न मिळाल्याने मंत्र्यांमध्ये निर्माण होणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याची जबाबदार न देता धुळे, लातूर, नांदेडची जबाबदारी दिली आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांना संभाजीनगरऐवजी जालना, बीड जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. मुंबईतील मंत्री नसल्याने सिंधुदुर्गातील दीपक केसरकर यांची मुंबईचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची वेळ आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रवींद्र चव्हाण यांना न देता शंभुराज देसाई यांना देऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपला धक्का दिला आहे. प्रत्येक मंत्र्यांवर दोन ते तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सहा जिल्ह्यांचा भार सोपवला आहे.

पालकमंत्री व जिल्हा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – (नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली), राधाकृष्ण विखे-पाटील – (नगर, सोलापूर), सुधीर मुनगंटीवार – (चंद्रपूर, गोंदिया), चंद्रकांत पाटील – (पुणे), विजयकुमार गावीत – (नंदुरबार), गिरीश महाजन – (धुळे, लातूर, नांदेड), गुलाबराव पाटील – (बुलढाणा, जळगाव), दादा भुसे – (नाशिक), संजय राठोड – (यवतमाळ, वाशीम), सुरेश खाडे – (सांगली), संदीपान भुमरे – (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत – (रत्नागिरी, रायगड), तानाजी सावंत -(परभणी), उस्मानाबाद (धाराशीव), रवींद्र चव्हाण – (पालघर, सिंधुदुर्ग), अब्दुल सत्तार – (हिंगोली), दीपक केसरकर – (म़ुंबई शहर, कोल्हापूर), अतुल सावे – (जालना, बीड), शंभुराज देसाई – (सातारा, ठाणे), मंगलप्रभात लोढा – (मुंबई उपनगर)