Fact Check – आता दुचाकी वाहनांनाही टोल द्यावा लागणार का?

देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून आता दुचाकीने टोल फ्री प्रवास करता येणार नाही. 15 जुलै, 2025 पासून देशभरातील दुचाकी वाहनधारकांकडूनही टोल वसूल करण्याची सरकारी योजना असल्याच्या बातम्या गुरुवारी सकाळी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.

अर्थात यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केली नव्हती, मात्र विविध माध्यमांनी दिलेल्या अशा प्रकारच्या बातम्यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र आम्ही याबाबत अधिक पडताळणी केली असता असा कोणताही आदेश सरकारकडून देण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले. आता याच बाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करत माहिती दिली आहे.

तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

नितीन गडकरी यांनी गुरुवारी दुपारी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल लावण्याबाबत दिशाभूल करणारे वृत्त पसरवत आहेत. दुचाकी वाहनांना टोल लावण्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट असणार आहे. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा निषेध करतो”, असे गडकरी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांनाही टोल लावला जाणार असल्याच्या बातम्या या फक्त अफवा असल्याचे स्पष्ट होते.