राज्य सरकारच्या लहरी धोरणाचा उद्या निषेध, भरतीवरील बंदीच्या तुघलकी आदेशाविरोधात शिक्षकेतरांचा संताप

माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी नोकर भरती बंदी संचमान्यतेच्या निकषामुळे बंद होती. वीस वर्षांच्या या ग्रहणानंतर शिक्षकेतर भरती सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि परत ही भरती बंदचा  आदेश  काढला. या लहरी धोरणाच्या निषेधार्थ 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. संतप्त संघटना शासनच्या या तुघलकी आदेशाची होळी करणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद भरती नसल्यामुळे शेकडो पदे रिक्त आहेत. न्यायालयीन लढाईनंतर ही पद भरती सुरू करण्याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचना दिलेल्या असताना शिक्षण संचालकांनी संच मान्यतेच्या कारणामुळे पदभरती बंद करणे योग्य नाही. शासनाने तत्काळ पद भरती सुरू ठेवण्यासाठी आदेश द्यावेत. दरम्यान, या निर्णयाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य दरवाजाजवळ आंदोलन व तीव्र निषेध व्यक्त करून संचालकांनी काढलेल्या आदेशाची होळी करण्यात येणार आहे.

z जिह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी व ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप शिक्षणाधिकारी यांची मान्यता मिळालेली नाही अशा बांधवांनीसुद्धा 17 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव गजानन नानचे यांनी केले आहे.

z बऱ्याच संस्थांमध्ये वीस वर्षे शिक्षकेतर भरती बंद असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. विविध कारणांनी रिक्त झालेल्या पदावर अद्यापही भरती झालेली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. अनेक कर्मचारी दुर्धर आजारांना बळी पडत आहेत.