ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीतील साडेसहा हजार कुटुंबांना ताबडतोब घरे रिकामी करण्याच्या नोटिसा; कारवाई झाल्यास जायचे कुठे? रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण-डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर हातोडा टाकण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा घरे खाली करण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र ऐन पावसाळ्यात नोटिसा बजावल्याने साडेसहा हजार कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बनावट कागदपत्रांवर आधारित नोंदणी करून 65 बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबत कल्याणचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरत संबंधित इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश केडीएमसीला दिले आहेत. या प्रकरणात डोंबिवली कोपर परिसरातील साई गॅलेक्सी या इमारतीतील रहिवाशांनी केलेली याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या सर्वच इमारतींमध्ये राहणाऱया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक रहिवाशांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून घरे विकत घेतली असून त्यांना आता बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशातच पालिकेने या इमारतींमध्ये राहणाऱया रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जायचे कुठे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.