Hera Pheri 3 – अखेर बाबू भैय्या पुन्हा ‘हेरा फेरी’ करण्यासाठी सज्ज!

‘हेरी फेरी’ या चित्रपटातील परेश रावल यांचे बाबू भैय्या हे पात्र चांगलेच गाजले. पहिल्या दोन भागांमधील इतर कलाकारांपेक्षा बाबू भैय्या या पात्राने चांगलाच भाव खाल्ला होता. परंतु तिसऱ्या भागासाठी मात्र अनेक चर्चांना उधाण आले होते. यातील महत्त्वाची चर्चा म्हणजे, बाबू भैय्या म्हणजेच दस्तुरखुद्द परेश रावल या चित्रपटात काम करणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ सोडल्याची बातमी आल्यानंतर चाहत्यांना खूप दु:ख झाले होते. त्यांनी चित्रपट सोडल्यानंतर, अनेक वाद निर्माण झाले. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना चित्रपटात परतण्याचे आवाहनही केले होते. आता बातमी अशी आहे की, जे काही वाद होते ते सर्व मिटले असून, परेश रावल पुन्हा एकदा बाबू भैय्या म्हणून आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळेच आता परेश रावल यांना ‘हेरा फेरी 3’ मध्ये आपल्याला पाहता येणार आहे.

परेश रावल यांनी स्वतः ही बातमी सांगितली आहे. जे काही वाद होते, ते सर्व ठीक आहे आणि ते परत येणार आहेत. द हिमांशू मेहता शो नावाच्या एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांना विचारण्यात आले की, काही वाद होता का? यावर ते म्हणाले, “कोणताही वाद नाही. माझा मुद्दा असा आहे की, जेव्हा एखादे पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनते. तेव्हा तुम्हाला अधिक सजग राहण्याची गरज असते.”

ते पुढे म्हणाले की, “प्रेक्षकांप्रती आपली जबाबदारी आहे, कारण प्रेक्षक इथे बसले आहेत, ते आपल्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. म्हणून माझी एकच इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र यावे, सर्वांनी कठोर परिश्रम करावे, दुसरे काही नाही.”

नेमका काय वाद होता?

परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर, अक्षय कुमारची केप गुड या कंपनीने परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. यावर परेश रावल म्हणाले की, जेव्हा चित्रपटाची पटकथा तयार नसते, तेव्हा भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही. परेश रावल यांनी त्यांना साइनिंग अमाउंट म्हणून मिळालेले 11 लाख रुपये व्याजासह परत केले होते. या प्रकरणावरून बराच गोंधळ उडाला होता.