सातपाटीला उधाणाचा तडाखा; 20 फुटांच्या अजस्त्र लाटा बंधारा तोडून घरात घुसल्या, 30 हून अधिक कुटुंबांच्या संसाराचा चिखल

उधाणाच्या तडाख्यांनी पालघरच्या सातपाटीत अक्षरशः हाहाकार उडवला आहे. तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेल्या या गावात तब्बल 20 फुटांच्या अजख लाटा धडकल्या. धूपप्रतिबंधक संरक्षक बंधारे या लाटांच्या तडाख्याने काही क्षणात उद्ध्वस्त झाले. बंधाऱ्यातील दगड तब्बल 15 फूट दूरवर फेकले गेले. त्सुनामी यावी अशा या लाटा घराघरांमध्ये घुसल्या. यात ३० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून ऐन पावसाळ्यात या कुटुंबांच्या संसाराचा चिखल झाला आहे. या घटनेनंतरही पालघरचे अख्खे जिल्हा प्रशासन वाढवण बंदराच्या कामाला जुंपल्याने संताप व्यक्त होत आहे. आमच्या जीवाला किंमत नाही का? केवळ वाढवण बंदर हेच सरकारचे लक्ष्य आहे का? असे खडे बोल सातपाटीवासीयांनी फडणवीस सरकारला सुनावले.

सागरी महामंडळाने 24 ते 29 जूनदरम्यान पालघर किनाऱ्यावर 5.25 मीटरच्या वर लाटा उसळण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने या लाटांचा जबरदस्त तडाखा सातपाटी, वडराई, दांडी, नवापूर आदी किनारपट्टीवरील गावांना बसला आहे. धो धो पाऊस सुरू असतानाच त्सुनामी यावी अशा जवळपास २० फुटांच्या लाटा एकामागोमाग एक सातपाटी तसेच अन्य गावांच्या किनाऱ्यांवर धडकू लागल्या. या गावांभोवती बांधलेले दगडमातीचे धूपप्रतिबंधक बंधारे काही क्षणात वाहून गेले. लाटांच्या माऱ्यात मोठमोठे दगड दहा ते पंधरा फुटांबर जाऊन पडले. किनाऱ्याला खेटून असलेल्या घरांच्या खिडक्या, दरवाजे तोडून पाण्याचे लोट घराघरांमध्ये घुसले.

समुद्राच्या लाटांनी आमची घरे उद्ध्वस्त झाली, संसार बुडाला. मात्र आमच्या जीवापेक्षा प्रशासनाला वाढवण बंदराचे सर्वेक्षण महत्त्वाचे वाटले. आमच्या मतांवर निवडून येणारा एकही लोकप्रतिनिधी येथे फिरकला नाही.

केतन चामरे, स्थानिक मच्छीमार

उधाणाचा सातपाटीसह अनेक गावांना तडाखा बसला. जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान होऊन अनेकांचा संसार वाहून गेला. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

आनंद गोवारी, स्थानिक मच्छीमार

पालघरचे जिल्हा प्रशासन ‘आका’च्या दबावाखाली

पालघरवासीयांचा विरोध डावलून वाढवण बंदराचे काम रेटण्यात येत आहे. मंगळवारी देखील वाढवणमध्ये बंदराच्या सर्वेक्षणाचे काम स्थानिकांनी उधळून लावले होते. त्यामुळे सत्तेतील ‘आका’ने जिल्हा प्रशासनाला वाढवणमध्ये तळ ठोकून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट दिल्याची चर्चा आहे. याच दबावातून सातपाटी सह अनेक गावांचे अजस्त्र लाटांनी नुकसान झाले असतानादेखील प्रशासनातील एकही अधिकारी अथवा आमदार, खासदार या गावांमध्ये फिरकलेला नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे.