
एखादा गुन्हा किंवा अपघात घडला तर घटनास्थळावरील वस्तू, रक्त आदींवरून गुन्हा कसा घडला असावा याचा अंदाज लावला जातो. आता घटनास्थळावरील रक्ताच्या वाळलेल्या थेंबावरूनही गुह्याची उकल करता येणार आहे. पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी त्यासंदर्भात महत्त्वाचे संशोधन केले आहे. रक्ताच्या वाळलेल्या थेंबांवरील भेगांवरून गुन्हा किंवा अपघात कधी घडला, किती अंतरावर घडला याचा अचूक निष्कर्ष काढता येणार आहे.
तिरक्या पृष्ठभागावरील वाळलेले रक्ताचे थेंब आणि त्यातील भेगा यांचा अभ्यास करून ते थेंब किती वेगाने आणि कोणत्या कोनात आदळले याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो, असे पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे. फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळावर पडलेल्या रक्ताच्या थेंबांची तपासणी करून घडलेल्या घटनेचा अंदाज बांधत असतात. रक्त वाळण्याची प्रक्रिया आणि वाळल्यानंतर त्यामध्ये आढळणारी भेगांची रचना यामागे एक विज्ञान आहे. ते रक्त तिथे कसे आणि केव्हा आले, किती प्रमाणात आले आणि किती अंश कोनावरून पडले असे अनेक बारकावे त्यातून उलगडू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याचा उपयोग केवळ न्यायदानासाठीच नव्हे तर वैद्यकीय निदान आणि जैवअभियांत्रिकीसारख्या क्षेत्रांना होऊ शकतो.
असे झाले संशोधन
आयआयटीतील संशोधकांनी या अभ्यासासाठी सुईच्या टोकावर आणि लहान बटणाच्या आकाराइतके म्हणजेच अनुक्रमे एक मायक्रोलिटर आणि दहा मायक्रोलिटरच्या विविध थेंबांचा अभ्यास केला. त्यांनी ते थेंब एका काचेच्या सपाट पृष्ठभागावर ठेवले आणि ती काच वेगवेगळय़ा अंशांमध्ये तिरकी करून पाहिली. ते थेंब सुकण्याच्या प्रक्रियेचे हाय-स्पीड पॅमेऱ्याने प्रत्यक्ष छायाचित्रण केले गेले व सूक्ष्मदर्शकांच्या सहाय्याने त्या प्रक्रियेचा अभ्यास केला. कॉफीचे थेंब वाळल्यानंतर तिथे लहानसे वर्तुळाकार कडे तयार होते. तसेच रक्ताचा थेंब वाळल्यानंतरही होते. त्या कडांच्या भागातील द्रवाचे लवकर बाष्प होते. त्यामुळे मधल्या भागातील कण कडांना खेचले जातात. पृष्ठभाग तिरका असला तर गुरुत्वाकर्षणामुळे रक्ताचा थेंब उताराच्या दिशेने खेचला जातो.