बेरोजगार तरुणांची वाढती फसवणूक! मुंबईतून पोलिसाला अटक

सर्वाधिक बेरोजगारांचा देश अशी भारताची ओळख असताना नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी देतो असे सांगून मोठ्या प्रमाणात फसविले जात आहे. यासाठी बऱ्याच टोळ्या कार्यरत असून अशा टोळ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी उपायुक्त आनंदराव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून रामसिंग बाळा डोलगे या मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व त्याचा साथीदार हसमुख विनोदभाई वाघेला अशा दोघांना अटक केली. वैभव रोहिदास तरे या तरुणाची पोलीस दलात नोकरी देतो, भरती करतो असे आमिष दाखवून सात लाख रुपयांची फसवणूक या दोघांनी केली होती, तर दुसऱ्या घटनेत आयकर विभागात नोकरी देतो असे सांगून एका पोलीस अधिकाऱ्याच्या भावालाच तीन लाख रुपयांना नवी मुंबईत फसविण्यात आल्याचे उघड झाले आहे.

आपल्या देशात 30 कोटींपेक्षाही अधिक बेरोजगारांची संख्या आहे. अशा तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून रोज फसविले जात आहे. आपल्या देशात सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत तरीही वैफल्यग्रस्त तरुण अज्ञानापोटी विश्वास ठेवून नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या भामट्यांवर विश्वास ठेवून त्यांना पैसे देत आहेत. घरातील दागदागिनेही विकत आहेत. खोटी आश्वासने देऊन परदेशातही नेले जात आहे व सायबर माफियांच्या कॉलसेंटरमध्ये बसविले जात आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भारतीय तरुण मुले मायदेशी परतण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे म्यानमारसारख्या देशात ‘पासपार्ट’ जप्त केले जातात. त्यांना कॉलसेंटरमध्येच डांबून ठेवले जाते. अशा सुमारे 600 तरुणांची मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच सुटका केली. देशात किंवा परदेशात नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या टोळ्यांपासून बेरोजगार तरुणांनी सावध रहावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.