सामना अग्रलेख – मोदी यांचे दत्तक‘विधान’

गेल्या आठवड्यात मोदी यांनी अयोध्येतील राममंदिरात प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत घातले. आता मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी ‘गंगामय्या’ची आरती केली. ‘गंगामय्याने आपल्याला दत्तक घेतले आहे,’ अशी भावनिक साद उत्तर प्रदेशातील जनतेला घातली, दत्तक‘विधान’ केले हे उघड आहे. मोदीजी, देशातील जनतेने 2014 आणि 2019 मध्ये मोठ्या अपेक्षेने तुम्हाला ‘दत्तक’च घेतले होते. प्रचंड बहुमताने देशाची सूत्रे तुमच्याकडे सोपविली, परंतु जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण जनतेने तुमचे दत्तक विधान रद्द करण्याचे ठरविले आहे, हे मात्र नक्की!

पंतप्रधान मोदी हे खूप संवेदनशील नेते आहेत, असा त्यांच्या भक्तमंडळींचा दावा असतो. स्वतः मोदी हेदेखील जाहीर कार्यक्रमात अधूनमधून भावूक वगैरे होताना दिसतात. त्यामुळे भक्तमंडळींच्या दाव्यात कळत-नकळत हवा भरली जात असते. आताही वाराणसीमध्ये मोदी असेच भावूक झालेले दिसले. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरण्यापूर्वी ते काही काळ त्यांच्या आईच्या आठवणींनी भावूक झाले. त्यांच्या आईंचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. आतापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदी त्यांच्या आईचा आशीर्वाद घेत असत. यंदा ती पोकळी जाणवल्याने त्यांना गहिवरून आले. हे अगदीच स्वाभाविक आहे. त्याच भावनेच्या भरात मोदी पुढे असे म्हणाले की, ‘आपल्या आईनंतर गंगा हीच माझी आई आहे आणि मला ‘गंगामय्या’ने दत्तक घेतले आहे.’ वाराणसीमधून लोकसभेसाठी मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची ही तिसरी वेळ आहे. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा येथून निवडणूक लढवली होती. त्या वेळी ते म्हणाले होते की, ‘मी येथे आलो नाही. मला येथे आणले गेले आहे.

माता गंगेने

मला येथे बोलावले आहे.’ आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘माता गंगेने आपल्याला दत्तक घेतले आहे!’ असे ते म्हणाले. मोदी यांचे हे दत्तक‘विधान’ त्यांच्या नेहमीच्या भावनिक राजकारणाला धरूनच आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याचे आधी जाहीर करणारे मोदी नंतर धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांवर घसरतात, हा जुनाच अनुभव आहे. आताही यापेक्षा वेगळे घडताना दिसत नाही. विकसित भारत हा मुद्दा त्यांनीच गुंडाळून ठेवला आहे आणि धार्मिक-भावनिक मुद्द्यांना हात घातला आहे. वाराणसीत त्यांनी जे आवाहन गंगामय्याच्या नावाने केले ती उत्तर प्रदेशमधील जनतेला घातलेली राजकीय सादच आहे. धार्मिक आणि भावनिक ‘कोंदणा’त राजकीय साद चपखल बसविण्यात मोदी यांची हातोटी आहे. त्याबाबतीत ते अत्यंत चलाख आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत आणि त्यातील मतदानाचे कल मोदींच्या ‘चार सौ पार’च्या गर्जना पोकळ ठरविणारे आहेत. मोदींनी वारंवार आवाहन करूनही

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील

मतदानाचे आकडे वाढताना दिसलेले नाहीत. उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली. दिल्लीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे हे परवडणारे नाही, याची जाणीव मोदींना झाली आहे. गेल्या आठवड्यात मोदी यांनी अयोध्येतील राममंदिरात प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत घातले. आता मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी ‘गंगामय्या’ची आरती केली. ‘गंगामय्याने आपल्याला दत्तक घेतले आहे,’ अशी भावनिक साद उत्तर प्रदेशातील जनतेला घातली, दत्तक‘विधान’ केले हे उघड आहे. मोदीजी, देशातील जनतेने 2014 आणि 2019 मध्ये मोठ्या अपेक्षेने तुम्हाला ‘दत्तक’च घेतले होते. प्रचंड बहुमताने देशाची सूत्रे तुमच्याकडे सोपविली, परंतु जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण जनतेने तुमचे दत्तक विधान रद्द करण्याचे ठरविले आहे, हे मात्र नक्की!