
प. बंगालच्या निवडणुका जिंकता याव्यात म्हणून पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी दाढी वाढवून रवींद्रनाथ टागोरांचे रूप धारण केले होते. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता त्यांनी प. बंगाल निवडणुकीसाठी ‘वंदे मातरम्’ आणि बंकिमचंद्र यांना वेठीस धरले, पण त्यात मोदी यांचीच फजिती झाली. प्रियंका गांधी यांनी तर हसत हसत मोदींच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रभक्तीचा बाजार आणि व्यापार करणे हाच पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांचा खेळ आहे. ‘वंदे मातरम्’ पवित्र असल्याने या प्रकरणात ते फसले आहेत. ‘वंदे मातरम्’चा गजर करीत भगतसिंगांपासून अशफाकउल्ला खानपर्यंत असंख्य क्रांतिवीर फासावर गेले. त्यात मोदी पक्षाचा एकही पूर्वज नव्हता. त्यांनी ‘वंदे मातरम्’वर ज्ञान पाजळावे हा अतिरेकच आहे!
‘वंदे मातरम्’ला दीडशे वर्षे झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एक ‘उत्सव’ म्हणजे ‘इव्हेंट’ करायचे ठरवले; पण हा खेळ पंतप्रधान मोदी व भाजपच्या अंगलट आल्याचे दिसते. ‘वंदे मातरम्’वर लोकसभेत चर्चा सुरू करून चूक केली असे मोदी यांना आता वाटत असेल. ‘वंदे मातरम्’ प्रकरणात समस्त विरोधी पक्षाने पंतप्रधान मोदींसह भाजपला वेड्यात काढले. भाजपच्या तथाकथित राष्ट्रवादाचा मुखवटाच ओरबाडून काढला. मुळात भाजप किंवा त्यांच्या संघ परिवाराचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी कोणताच संबंध नाही. या लोकांच्या अंगावर स्वातंत्र्य लढ्यात साधा ओरखडाही उमटला नाही आणि हे ढोंगी राष्ट्रवाद, देशभक्ती, ‘वंदे मातरम्’वर देशाला ज्ञान देतात हा विनोद आहे. 1896 मध्ये कोलकाता काँग्रेस अधिवेशनात तरुण रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसच्या मंचावरून प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले तेव्हा लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी यांच्यासह संपूर्ण सभागृह राष्ट्रभक्तीने रोमांचित होऊन उभे राहिले. त्या क्षणापासून हे गीत राष्ट्राचा आत्मा बनले. अर्थात विडंबना अशी की, ज्या काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ला मंच दिला, प्रतिष्ठा दिली, स्वातंत्र्य सैनिकांचा, क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्य लढय़ाचा आवाज बनवला, त्याच काँग्रेसकडून नव्या जमान्यातील राष्ट्रभक्तीचे ठेकेदार राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र मागत आहेत. भाजपचे पूर्वज स्वातंत्र्य लढय़ात नव्हते. ते इंग्रज आणि मोहम्मद अली जीनांबरोबर होते. द्विराष्ट्रवादाचे समर्थन करीत होते व आता सत्तेवर बसून राष्ट्रभक्तीवर ज्ञान पाजळत आहेत. भाजपला व संघ परिवारास अचानक ‘वंदे मातरम्’वर प्रेम उफाळून आले. हा बंगाल निवडणुकीसाठी चाललेला खेळ आहे. संघ परिवाराने देशाला सांगायला हवे की, त्यांच्या
शाखांमध्ये सर्वप्रथम
‘वंदे मातरम्’ कधी गायले होते? संघाने तेसुद्धा स्पष्ट केले पाहिजे की, त्यांना ‘वंदे मातरम्’बाबत इतके प्रेम होते तर आपल्या शाखांत ‘वंदे मातरम्’ऐवजी ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’चा स्वीकार का केला? ‘वंदे मातरम्’वरील चर्चेत पंतप्रधान मोदी नेहमीप्रमाणे नेहरूंवर घसरले. नेहरूंनी मोदींची निंद हराम केली आहे. प्रे. ट्रम्प, पुतीन यांच्याबरोबर कितीही मेजवान्या झोडल्या व त्यांना मिठ्या मारल्या तरी पंडित नेहरूंना जागतिक नेते म्हणून मिळालेला मान, प्रतिष्ठा मोदींच्या वाट्याला येऊ शकत नाही. निवडणुकीत घोटाळे करून, पैशांचा वापर करून निवडून येणाऱया सरकारचे पंतप्रधान हीच त्यांची जागतिक ओळख आहे. ‘वंदे मातरम्’वरील चर्चेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची भंबेरी उडवली. सत्ताधारी खासदारांची वाचाच गेली. प्रियंका म्हणाल्या, ‘‘जितकी वर्षे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तितकी वर्षे जवाहरलाल नेहरू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात राहिले.’’ नेहरू 17 वर्षे प्रधानमंत्री राहिले व त्यांनी देश घडवण्याचे काम केले. प्रियंकाने हसत हसत सांगितले, ‘‘मोदीजी, नेहरू नेहरू काय करता? नेहरूंनी जर इस्रो बनवले नसते तर मंगळयान उडाले नसते, DRDO बनवले नसते तर ‘तेजस’ झेपावले नसते. IIT-IIM बनवले नसते तर आपण ‘आयटी’त आघाडीवर नसतो. AIIMS बनवले नसते तर कोरोनाशी सामना कसा केला असता? BHEL-SAIL सारखे सार्वजनिक उपक्रम उभे केले नसते तर आजचा विकसित भारत दिसलाच नसता. पंडित नेहरूंना दोष का देता? नेहरूंनी या देशासाठी, देशाची सेवा करीत शेवटचा श्वास घेतला.’’ प्रियंका गांधींचे हे बोलणे जबरदस्त होते व त्याचा प्रतिवाद मोदी व त्यांचे खासदार करू शकले नाहीत. श्रीमती प्रियंका गांधी पुढे जे म्हणाल्या, म्हणजे त्यांनी
मोदी यांना जे आव्हान
दिले ते महत्त्वाचे. त्या म्हणाल्या, ‘‘मोदीजी, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींना काय बोलायचंय, दोष द्यायचेत ते एकदाचे देऊन टाका. त्यासाठी हवे तेवढे तास चर्चा ठेवा; पण त्यानंतर मात्र ते थांबवा आणि बेरोजगारी, महागाई, महिलांच्या समस्या यावर पण चर्चा करू या.’’ पंतप्रधान मोदी यांनी ‘वंदे मातरम्’वरील चर्चेत नेहरूंवर तुष्टीकरणाचा आरोप केला, पण याच मोदी यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना स्वतःच्या शपथविधीस बोलावून हिरव्या पायघड्याच राष्ट्रपती भवनात अंथरल्या होत्या. हा तर तुष्टीकरणाचा कळस होता. हेच मोदी अचानक पाकिस्तानला जाऊन शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन आले. त्या केकची आणि बिर्याणीची शिते मोदी भक्तांच्या दातांत अजून अडकलेली दिसतात. देशात असंख्य प्रश्न थैमान घालीत असताना पंतप्रधान मोदी व त्यांचे अंधभक्त ‘वंदे मातरम्’वर वाद उकरून काढतात. देशाची हवाई नागरी सेवा उद्ध्वस्त झाली आहे. अनेक म्हातारे, आजारी लोक विमानतळावर अडकून पडले आहेत. लोकांची लूट चालली आहे आणि मोदी संसदेत वंदे मातरम्चे वाद आणि चर्चा करण्यात व्यस्त आहेत. प. बंगालच्या निवडणुका जिंकता याव्यात म्हणून पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी दाढी वाढवून रवींद्रनाथ टागोरांचे रूप धारण केले होते. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता त्यांनी प. बंगाल निवडणुकीसाठी ‘वंदे मातरम्’ आणि बंकिमचंद्र यांना वेठीस धरले, पण त्यात मोदी यांचीच फजिती झाली. प्रियंका गांधी यांनी तर हसत हसत मोदींच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रभक्तीचा बाजार आणि व्यापार करणे हाच पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांचा खेळ आहे. ‘वंदे मातरम्’ पवित्र असल्याने या प्रकरणात ते फसले आहेत. ‘वंदे मातरम्’चा गजर करीत भगतसिंगांपासून अशफाकउल्ला खानपर्यंत असंख्य क्रांतिवीर फासावर गेले. त्यात मोदी पक्षाचा एकही पूर्वज नव्हता. त्यांनी ‘वंदे मातरम्’वर ज्ञान पाजळावे हा अतिरेकच आहे!































































