मृत्युनंतरही बाळासाहेबांची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, संजय राऊत यांचा रामदास कदम यांना इशारा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचेही राजकारण करणारे मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गर्भित इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्युनंतर जी विटंबना हे लोक करत आहेत, त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिला.

संजय राऊत म्हणाले की, रामदास कदम हा कधीच भरवशाचा माणूस नव्हता. खरे म्हणजे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून पूजा केली पाहिजे. कोकणात विधानसभेची निवडणूक हरल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवले. दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्याने पाठवायला पक्षाचा विरोध होता. त्यातले एक रामदास कदम आणि दुसऱ्या निलम गोऱ्हे.

निलम गोऱ्हे यांचे पक्षातील योगदान काय? हा प्रश्न कायम विचारला जातो आणि रामदास कदम यांना इतके वर्ष आमदार, मंत्री म्हणून संधी मिळाल्याने त्यांना वारंवार विधान परिषदेवर का पाठवता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पक्षातून विचारण्यात आला. तरीही उद्धव ठाकरे हे दया बुद्धीचे गृहस्थ असल्यामुळे त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर (12 वर्ष) पाठवले. अशा माणसाने ठाकरे कुटुंबाप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. पण आता ते गरळ ओकत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्युनंतर जी विटंबना हे लोक करत आहेत, त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल. हे मी अत्यंत जबाबदारी सांगतोय. ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल. कायदेशीर असेल, भावनिक असेल किंवा नियतीची असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात अशा प्रकारची विधाने करताना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. त्या संपूर्ण घटनाक्रमावेळी आम्ही काही मोजले लोक तिथे उपस्थित होतो. आम्हाला माहिती आहे आमची काय अवस्था होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेबांच्या मृत्युची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत मजल गेली असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवले. रामदास कदम यांनी पक्षामध्ये अनेक वर्ष काम केले. पक्षानेही त्यांना भरपूर दिले. खास करून उद्धव ठाकरे यांनी दिले. विरोधी पक्षनेते पद, मंत्रीपद असेल हे त्यांना उद्धव ठाकरे यांनी दिले. विधान परिषदेतील नेमणूक असेल हे उद्धव ठाकरे यांनी दिलेली पदं आहेत. बाळासाहेबांनंतर सूत्र जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी बाळासाहेबांबरोबर काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवले. अशावेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी बोलताय, पण त्यांच्यावर महाराष्ट्र थुंकतोय. मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो, असेही राऊत यावेळी म्हणाले.

पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो. ठाकरेंच्या सुख-दु:खात हे लोक कुठेच नव्हते. जे पक्ष सोडून गेलेले आहे ते बाळासाहेबांना कधीच दैवत मानू शकत नाहीत. एकनाथ शिंदेंपासून जे लोक भाजप, मोदींच्या चरणी विलीन झाले आहेत, शस्त्र म्हणून शहांच्या जोड्यांची पूजा करताहेत त्यांनी बाळासाहेबांना ठाकरे यांना दैवत मानण्याचे काम नाही, असेही राऊत म्हणाले.