
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनो असे लढा की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. महाराष्ट्रात विरोधक दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, अशी दर्पोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते,खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ”देशाच्या लोकशाहीतील विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो तो मूर्ख आहे”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.
”अमित शहा काही सर्वेसर्वा नाही. लोकशाहीचे मालक नाही. जो माणूस देशाच्या लोकशाहीतील विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो तो मूर्ख आहे. या देशात विरोधी पक्ष राहिलं. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे. लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून जनतेचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय. आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केलाय म्हणून तुम्ही उघडे पडताय. विरोधी पक्षाला बघून तुम्ही चळाचळा कापताय. अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होतंय. इदी आमीन प्रमाणे हे लोकशाही संपवायला निघाले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.






























































