
सोलापूर जिह्यातील डोणगाव येथील सरपंच संजय भोसले यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून पुणे विभागीय अपर आयुक्तांनी रद्द केलेले सरपंचपद वैध असल्याचा निकाल कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती चपळगावकर यांनी दिला.
सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला असून, तीन अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे.
भारत सरकारच्या लघु कुटुंब कायदा 2005 नुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला तीन अपत्ये असल्यास कोणताच शासकीय लाभ किंवा निवडणुकीला उभे राहता येत नाही असा कायदा आहे. मात्र, सोलापूर जिह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजपचे संजय भोसले हे डोणगावचे सरपंच म्हणून कार्यरत असताना विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध तीन अपत्ये असल्याची तक्रार करून सोलापूर जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. त्यावर निकाल देताना अपर आयुक्तांनी संजय भोसले यांचे सरपंचपद रद्द ठरवले. यावर संजय भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संजय भोसले यांच्या वकिलांनी संजय भोसले यांनी उमेदवारी दाखल करताना त्यांना दोनच अपत्ये हयातीत असल्याचा युक्तिवाद करून पुरावे न्यायालयासमोर सादर केले. ते ग्राह्य धरून न्यायालयाने संजय भोसले यांचे सरपंचपद वैध ठरवून ऐतिहासिक निर्णय दिला. या खटल्यात संजय भोसले यांच्या वतीने ऍड. विनीत नाईक, ऍड. आय. एम. खैरदी, ऍड. नितीन हबीब तर विरोधकांच्या वतीने ऍड. अभिजित कुलकर्णी यांनी काम पाहिले.

























































