
भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे फडणवीस सतत सांगत आहेत. मात्र, त्यांच्या सरकारच्याच काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार होत आहे. असे असूनही फडणवीस काहीही कारवाई न करता फक्त घोषणा करत जनतेची दिशाभूल करत आहेत. सत्यमेव जयते, हे आपले ब्रीद आहे, याचे भान फडणवीस यांनी ठेवावे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना सुनावले.
भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. केंद्रातही पंतप्रधानांकडून मंत्र्यांचे पीए नेमले गेले. सर्वात जास्त भ्रष्टाचार याच लोकांनी केला आहे. महाराष्ट्रतही हाच पीए आणि ओएजी फॉर्म्युला लागू केला. परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना पीए आणि ओएजी देण्यात आले. त्यांचे पीएआणि ओएजी सर्वात भ्रष्ट आहेत. धुळ्यातील 102 खोली क्रमांक हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे फडणवीस यांनी जनतेला खोटी माहिती देत दिशाभूल करू नये, सत्यमेव जयते हे आपले ब्रीद आहे, याचे जरा भान ठेवा, असेही संजय राऊत म्हणाले.
देशात आणि राज्यात कृषी खाते महत्त्वाचे आणि संवेदनशील मानले जाते. आपला देश कृषीप्रधान आहे, आपल्या देशातील 75 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. असे असताना कृषीमंत्रीच खात्याबाबत उदासीन असेल, कृषी खातं ही शिक्षा मानली जात असेल तर त्या राज्यात शेतकऱ्यांचे काय कल्याण होणार,असा सवाल त्यांनी केला. कृषीमंत्रई म्हणजे ओसाड गावटची पाटीलकी असे वक्तव्य केलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. मंत्रीच जर गांभीर्याने काम करत नसतील तर राज्य चालणार कसे? शिक्षण,कृषी ही खाती मंत्र्यांना शिक्षा वाटत आहे. नगरविकास, महसूल ही मलईदार खाती सर्वांना हवी आहेत. मात्र, जनतेच्या हिताची आणि राज्याच्या कल्याणाची खाती कोणालाच नको आहेत, असेही ते म्हणाले.
शिंदे, फडणवीस यांचे राज्य पुन्हा आल्यावर जनतेची कायद्याची आणि पोलिसांची भीती संपली आहे. त्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हे केले तरी कायद्याचे हात आमच्यापर्यंत पोहचू शकत नाही, आपल्याला वाचवणारे कोणीतरी आहे, पैसे देत सुटका होईल, असे गुन्हेगारांना वाटते. त्यामुळे कायद्याची भीती संपली आहे. राज्यकर्तेच क्रूर आणि विकृत असल्याने जनतेतही हीच भावना वाढत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.