
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने प्रारुप मतदान घेण्यात आले. कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या 485 कुटुंबांपैकी 458 कुटुंबांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान करुन आपला विरोध नोंदविला. बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. ईव्हीएमचा पुरस्कार करणारे राज्य शासन याकडे किती गांभीर्याने पाहते याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर जाहीर केल्यापासून श्री विठ्ठल मंदिर परिसरातील नागरिक, व्यापारी यांनी विरोध केला आहे. या विरोधात विविध आंदोलने केली जात आहेत. दरम्यान संभाव्य बाधितांची तीर्थक्षेत्र बचाव समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीच्या वतीने शनिवार दि.14 रोजी अभिरूप पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडली. कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी बचाव समितीने हे अनोखे आंदोलन आयोजित केले होते.
येथील हिंदुसभा भवन येथे आयोजित मतदानास बाधित नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्या असल्याचे चित्र होते. सकाळी दहा वाजल्यापासून संभाव्य बाधितांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संभाव्य बाधितांना नोटीसा बजावून केबीपी महाविद्यालयात चर्चेसाठी निमंत्रित केले होते. अशा नोटीसा प्राप्त नागरिक, व्यापारी यांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. संभाव्य बाधिताची नोटीस पाहून किंवा बाधिताच्या मालमत्तेचा उतारा, वीज बिल यापैकी एक पुरावा पाहून मतदान करू दिले जात होते.
सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया पार पडली. यानंतर चार वाजता मतमोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण बाधित 585 पैकी 485 जणांनी मतदानात सहभाग घेतला. या 485 मतदारांपैकी 458 जणांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान केले. तर 15 जणांनी कॉरिडॉरला पाठींबा, 9 जण तठस्थ व 3 मते बाद ठरविण्यात आली. अनेक संभाव्य बाधित परगावी असल्याने मतदान करू शकले नाहीत. दरम्यान मतमोजणीची सर्व प्रक्रीया करताना चित्रीकरण करण्यात आले होते. याबाबत सर्व माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठविण्यात येणार असल्याचे बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी सांगितले.