
मतदारांना खूश करण्यासाठी सवलतीच्या योजनांच्या केलेल्या घोषणा राज्य सरकारला डोईजड ठरत आहेत. एसटी प्रवासात 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला; मात्र या योजनेतील लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी ज्येष्ठांच्या नावाखाली वाढीव तिकिटे कापली जात असल्याच्या संशयामुळे एसटी फेऱयांमध्ये झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची घोषणा सरकारने केली. यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱया ज्येष्ठांचे प्रमाण वाढले आहे. या सवलतीची रक्कम सरकार एसटी महामंडळाला देत आहे. याचा मोठा भार तिजोरीवर पडल्याने सरकारने आता ज्येष्ठांच्या मोफत प्रवासावर वक्रदृष्टी रोखली आहे. सरकारने निर्देश दिल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठांच्या योजनेचा आढावा घेण्यासाठी सर्व आगारांच्या एसटी बसफेऱयांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. शिवनेरीसह सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये ज्येष्ठांच्या प्रवासाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे मोफत प्रवास योजना बंद होणार की काय, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडला आहे.
योजनेची लोकप्रियता दाखवण्याचा आटापिटा
ज्येष्ठांच्या मोफत प्रवासाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे हे दाखवण्यासाठी तसेच महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी एसटी आगारांमध्ये ज्येष्ठांच्या नावाखाली जादा तिकिटे कापली जात असल्याचे समजते. त्यामुळे मोफत प्रवासाचे लाभार्थी वाढल्याने सरकार बुचकळय़ात पडले आहे. राज्यभरात एसटीचे 275 आगार असून मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱया ज्येष्ठ नागरिकांची संख्या कोटय़वधीच्या घरात आहे.
एसटीच्या 31 विभागांना मार्ग तपासणीच्या सूचना
सरकारने केलेल्या सूचनेनंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या 31 विभागांना मार्ग तपासणी कार्यक्रम राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी विभागात उपलब्ध असलेल्या सर्व स्टाफ कार, मार्गतपासणी जीप्स, ट्रेनिंग बस, स्टोर ट्रक व इतर वाहनांचा वापर करा, आगारातील सर्व मार्ग, सर्व वाहक, सर्व बसेस, सर्व रात्रवस्ती आणि सर्व फेऱयांची 100 टक्के तपासणी करा, अशा सक्त सूचना विभागांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.