
>> सुरेश चव्हाण
कोणापुढेही हात न पसरता, स्वाभिमानाने जगण्यासाठी धडपडणाऱ्या दृष्टिहीनांसाठी आधारवड बनत अकोल्यामध्ये मंजुश्रीताई आणि गोविंद कुलकर्णी या दाम्पत्याने 2009 पासून स्वतच्या घरीच ‘क्षितिज’ या विरंगुळा केंद्राची स्थापना केली.
तुमच्या मनात समाजातल्या दुर्बल घटकांसाठी काही करायची इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग सापडतोच. अकोल्यात राहाणाऱया मंजुश्री कुलकर्णी या सर्वसामान्य गृहिणीच्या आयुष्यात असेच काहीसे घडले. 1999 साली मंजुश्रीताई आनंदवनात साधनाताई आमटे यांना भेटल्या. तेव्हा समाजकार्याच्या भावनेचे बीज त्यांच्या मनात रुजले. तिथे बेला ही अंध मुलगी त्यांना भेटली. कोणापुढे हात पसरण्यापेक्षा ताठ मानेने जगण्याचा तिचा निर्धार त्यांना खूप भावला. समाजात अनेक गरीब, अंध स्त्री-पुरुष भीक मागून आपले जीवन व्यतीत करताना त्या पाहत होत्या. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, बेलासारखे स्वाभिमानाने जगणारे अनेकजण असतील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचे, असे त्यांनी ठरवले.
मंजुश्रीताई अकोल्यात परत आल्या. त्यांनी आपल्या मनातील विचार त्यांचे पती गोविंद कुलकर्णी यांना सांगितले. त्यांनाही समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला 2003 साल उजाडले. काही घरगुती अडचणींमुळे काही वर्षं लागली, पण त्यांचा निर्धार पक्का होता. अकोल्यातील जठार पेठेत राहणाऱया अंध सुमनताईंना वाचनाची खूप आवड होती. बाजारात नवीन पुस्तक आले की, त्या ते विकत आणायच्या आणि दुसऱयाकडून वाचून घ्यायच्या. मंजुश्रीताईंना हे कळल्यावर त्या सुमनताईंच्या घरी गेल्या व त्यांना म्हणाल्या, ‘मी तुम्हाला पुस्तक वाचून दाखवीन’ आणि इथूनच त्यांच्या कामाला सुरुवात झाली. आसपासच्या परिसरातील इतर अंध व्यक्तींची माहिती त्यांनी मिळवली व त्या अंध विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवायला सुरुवात केली. या कामी त्यांच्या पतींचे त्यांना सहकार्य मिळाले.
2005 साली मंजुश्रीताई ब्रेल लिपी शिकल्या. तेव्हा त्यांना कळले की, सातवी इयत्तेपर्यंतच ब्रेल लिपीची पुस्तके उपलब्ध आहेत. सातवीनंतर या मुलांचे काय, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करू लागला. कारण या मुलांना सर्वसामान्य मुलांचा अभ्यास झेपत नाही आणि त्यांना तो कोणी वाचूनही दाखवत नाही. शहरात राहणाऱया मुलांपेक्षा गावात राहणाऱया मुलांचे काम काय होत असेल, या विचारातून त्यांनी नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड) या संस्थेकडून जिह्यातील अंध मुलांची यादी मागवली आणि या मुलांशी संपर्क साधायला सुरुवात केली. यातूनच त्यांना कोणत्या विद्यार्थ्याला कशाची आवड, कुठला छंद आहे; तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांची माहितीही मिळू लागली. मग त्यांनी 2009 साली स्वतच्या घरी ‘क्षितिज’ या दृष्टिहीनांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना केली.
केंद्राची स्थापना होताच, आजूबाजूच्या परिसरातील 60 ते 70 मुले-मुली एकत्र आले. तेव्हा त्यांना तिथे पुस्तक वाचून दाखवणे, पत्ते खेळणे, बुद्धिबळ खेळणे, अंधांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देणे, मुलांचे वाढदिवस साजरे करणे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच त्यांनी स्वतच्या पायांवर उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मंजुश्रीताईंनी आठवी पास झालेल्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना दहावीच्या परीक्षेला बसवले. शाळा सोडल्यामुळे ही मुले अभ्यासापासून दुरावली होती. त्यांच्या अभ्यासक्रमाचे ध्वनिमुद्रण करून, ते त्यांना ऐकवून (त्यांची स्मरणशक्ती उत्तम असते) आणि त्याचबरोबर त्या मुलांचा इतर अभ्यास घेऊन व त्यांच्या अफाट मेहनतीने 22 मुले बारावीची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण झाली व आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. अशी अनेक मुले मंजुश्रीताईंच्या मदतीने बी.ए., बी.एड. होऊन नोकरी करत आहेत. पण हे सर्व करताना अनेकांनी कुलकर्णी दाम्पत्याला मदत केली. या मुलांनीही स्वतचे काही उत्पन्न असावे, म्हणून कमी गुंतवणुकीचे व्यवसाय जसे, राख्या, कागदी पिशव्या आदी बनवायला सुरुवात केली.
या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त योगासने शिकवायला सुरुवात केली. यामध्ये मंजुश्रीताईंना त्यांच्या मैत्रिणींनी मदत केली. या मुलांना राहण्यासाठी त्यांनी तीन खोल्या भाडय़ाने घेतल्या आहेत. तिथे येऊन अनेकजणी या मुलांना शिकवू लागल्या. अकोल्यातील जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये यांपैकी काहींनी भाग घेतला होता. तेव्हा अंधांना परवानगी कशी द्यायची, असा प्रश्न आयोजकांना पडला. तेव्हा त्यांपैकीच एक विद्यार्थिनी मोनाली देव आयोजकांना म्हणाली, ‘आमच्याकडून योगासनं करून घ्या, नंतर प्रवेश द्या!’ तिचे हे आत्मविश्वासपूर्ण उत्तर ऐकून आयोजकांनी ‘क्षितिज’ संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. हीच मुलगी पुढे जिह्यातून प्रथम आली व राज्यस्तरीय स्पर्धेतही ती जिंकली. एवढेच नव्हे तर बारावीला तिने 75 टक्के गुण मिळवले.
2008 पासून दृष्टिहीन मुला-मुलींसाठी अकोला व पुणे येथे ‘क्षितिज’च्या माध्यमातून काम सुरू आहे. आजवर अनेक मुला-मुलींना बँक, रेल्वे, जीवन विमा निगम तसेच सरकारी कार्यालये, शाळेत शिक्षकांच्या नोकऱया मिळाल्या आहेत. यांपैकी काही विद्यार्थी संगीत शिकून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहेत. तर काहींनी लग्न करून आपले संसार सुरू केले आहेत. मंजुश्रीताईंच्या या कार्याबद्दल त्यांना ‘लोकसत्ता नवदुर्गा पुरस्कार’, ‘दीपस्तंभ संस्था, जळगाव’, लोकमंगल फाऊंडेशनतर्फे ‘स्त्राr सन्मान पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सध्या अकोल्यात त्यांच्या राहत्या घरीच त्यांचे हे कार्य सुरू आहे. विद्यार्थी अभ्यासाला येतात, त्यांना त्यांचा अभ्यासक्रम रेकॉर्ड करून दिला जातो, प्रोजेक्ट तयार करून दिले जातात. त्यांना काही आर्थिक मदतीची गरज भासल्यास मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून त्यांना ती दिली जाते. सध्या ते इतरांकडून देणग्या स्वीकारत नाहीत. अकोल्यातच मंजुश्रीताईंच्या 15 मैत्रिणींचा ग्रुप आहे. आता ‘क्षितिज’चे काम त्याच पाहतात. मनात आणले तर एक सर्वसामान्य गृहिणीही केवढे समाजोपयोगी कार्य उभे करू शकते, हे महाराष्ट्रातील अनेकजणींनी करून दाखवले आहे, हेच या मैत्रिणी एकत्र येऊन करीत आहेत.