
राहुरी तालुक्यात एकाच दिवशी शुक्रवारी आत्महत्येच्या दोन घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील चिंचविहिरे, तांभेरे या गावात आत्महत्येची घटना घडली. पहिली घटना चिंचविहिरे येथे शुक्रवारी दुपारी घडली. ‘दारू पिऊन का आलात’, असे पत्नीने विचारल्याचा राग आल्याने पतीने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल बाळासाहेब नालकर (वय 28) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. यावेळी पत्नीने आरडाओरडा केल्याने परिसरातील शांताराम नालकर, निखिल नालकर, नंदू साळवे, मारुती नालकर, पोलीस पाटील सुधाकर नरवडे आदी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. बंद घराचा दरवाजा तोडून अमोलला तत्काळ रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
दुसरी घटना तालुक्यातील तांभेरे येथे घडली. विजय जाधव (वय 22) या तरुणाने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विजय दिगंबर जाधव असे तरुणाचे नाव आहे. विजय हा घरापासून काही अंतरावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन विजय जाधव याला ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारापूर्वीच विजय मयत झाल्याचे घोषित केले. विजय जाधव या तरुणाचे 10 जून रोजी 2025 लग्न ठरले होते. अवघ्या 11 दिवसांवर लग्न आले असताना, विजय याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले.