
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीत सहभाग घेत खणखणीत भूमिका मांडली. त्यांनी 2029च्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण दिशादर्शन केले. ‘‘भाजपचे आव्हान पेलण्यासाठी इंडिया आघाडी आणखी मजबूत करावी लागेल. एकजुटीने काम करावे लागेल. त्यासाठी एका समन्वयकाची गरज आहे,’’ असे त्यांनी सांगितले. ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल. हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे हे लोकांना सांगावे लागेल,’’ असे परखड मतही उद्धव ठाकरे यांनी मांडले.
देशातील राजकीय व सामाजिक स्थितीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘‘देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्व संविधानिक संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भारतीय संघराज्य पद्धती मोडीत काढली जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘एक देश, एक इलेक्शन’ अशी घोषणा देणारा भाजप आता ‘एक पार्टी, एक इलेक्शन’च्या दिशेने वाटचाल करत आहे. हे आव्हान इंडिया आघाडीला एकजुटीने स्वीकारावे लागेल! – उद्धव ठाकरे





























































