
मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱया वाहतूककोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. कोकणात ये-जा करणाऱया चाकरमान्यांना या वाहतूककोंडीमुळे बराच त्रास सहन करावा लागतो. ही कोंडी दूर करण्यासाठी चार पर्यायी मार्गांच्या कामांना गती देण्यात येणार असून त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आज राज्य शासनाने दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती व अन्य उपाययोजनांबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूककोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगर पंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई- गोवा महामार्गावरील इंदापूर पॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता अशा चारही रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश या बैठकीत अजित पवार यांनी दिले.