
मुंबईकर उकाड्याने प्रचंड हैराण झाले असतानाच हवामान खात्याने पावसाच्या आगमनाचा अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पुढील तीन ते चार तासांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी लागेल, यादरम्यान सोसाट्याचा वाराही सुटेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबत इशारा जारी केला आहे. पुढील 3-4 तासांत मुंबई परिसरातील काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याने नागरिकांना घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच हवामानात अचानक होत असलेल्या मोठ्या बदलांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईलगतच्या ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही अशीच हवामान परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.