
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण ताजे असतानाच, लग्नात स्कोडा कार, 15 तोळे सोने तसेच इतर महागड्या वस्तू देऊनही पैशांसाठी पती, सासू, दीर, मावस सासू-सासऱ्यांनी छळ केल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. काठी, बेल्टने मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे यांनी सोमवारी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केला. मारहाणीचे पुरावे असलेला मोबाईल हिसकावला. गुन्हे मागे घेण्यासाठी धमकी दिली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही ऐश्वर्या यांनी केला. यावेळी ऐश्वर्या यांचे आई-वडील उपस्थित होते.
ऐश्वर्या हुलावळे म्हणाल्या, आदित्य हुलावळे यांच्याशी 28 फेब्रुवारी 2017 रोजी भोसरीत लग्न झाले. सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक स्कोडा कार, 15 तोळे सोन्याचे दागिने व अन्य सुख-सुविधांच्या सर्व वस्तू दिल्या गेल्या. वडील 81 टक्के अपंग असतानाही त्यांनी जमीन विकून वस्तू दिल्या. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर माहेराहून पैसे आणण्यासाठी पती, सासू, दीर, आजोबा, मावस सासू, मावस सासरे यांनी छळ करण्यास सुरुवात केली. पतीचे बाहेरील अनैतिक संबंध कळल्यावर तक्रार केली असता, सासरच्यांनी मारहाण केली. तसेच, ‘माहेराहून पाच लाख रुपये घेऊन आल्यास नांदवू, अन्यथा घरातून निघून जा,’ अशी धमकी दिली. मी डिसेंबर २०१७ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलीस ठाण्यातही सासरच्यांकडून धमकी दिली गेली. भाजीमध्ये उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन 5 जानेवारी आणि 15 जानेवारी 2018 रोजी पुन्हा तक्रार अर्ज दिला. यावेळी दोन्ही कुटुंबाला एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले. मात्र, यावेळीदेखील प्रकरण मिटले नाही. त्यानंतर पुन्हा ३ मार्च २०१८ रोजी हिंजवडी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही.
या प्रकरणात हिंजवडीतील गुन्ह्याचा तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले. भाजप शहराध्यक्षांच्या भावासह इतरांनी धक्के देऊन बाहेर काढले. पिंपळे सौदागर येथील सासरच्या कार्यक्रमासाठी २४ मार्च २०२५ रोजी मी आली असता, मला मारहाण करण्यात आली. माझा मोबाईलही हिसकावून घेतला. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे बंधू भरत काटे यांच्यासह २० ते २५ जणांनी मारहाण, शिवीगाळ करीत धक्के देऊन मला बाहेर काढले. याबाबत सांगवी पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज घेतला. गुन्हा दाखल केला नाही, याबाबतचे पत्र राज्य महिला आयोगाला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. मी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या स्वीय सहायकाच्या संपर्कात होते. त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले.