
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार, आदित्य ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘महाराष्ट्र व मराठी हितासाठी कुणी एकत्र यायला तयार असेल तर त्यांना सोबत घेऊन लढू’, असे सांगितले आहे. मनसे-शिवसेना युतीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
”आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना हिच आहे की मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्रासाठी जर कुणी एकत्र यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवाकडे दिपेश म्हात्रे आणि मनसेचे राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे. आमचं मन साफ आहे. महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष, कुठलाही नेता आमच्यासोबत यायला तयार असेल तर आम्ही एकत्र लढू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यात असलेले वाद, भांडणे ही अत्यंत क्षुल्लक आणि किरकोळ आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात काही कठीण असल्याचे मला वाटत नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडली होती. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबत असलेली किरकोळ भांडणे, वाद बाजूला ठेवून एकत्र काम करण्यास आपण तयार असल्याचे सूतोवाच केले होते.