तत्काळ तिकिटांच्या काळाबाजाराला आळा बसणार, रेल्वे तिकीट काढण्यासाठी आता ई-आधार व्हेरिफिकेशन आवश्यक

रेल्वेच्या तिकीट बुकिंग घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आणि आयआरसीटीसीकडून तब्बल 2.5 कोटी बोगस आयडी ब्लॉक केल्यानंतर आता रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार व्हेरिफिकेशन आवश्यक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे रेल्वेचे तिकीट बुकिंग करणाऱया सर्वसामान्यांना तिकीट उपलब्ध होऊ शकणार आहेत. कारण, याआधी तत्काळ तिकीट बुक करताना तिकीट उपलब्ध नाही, असे सर्रास मेसेज येत असत. परंतु आता रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल केला आहे. तिकीट बुकिंग करण्यासाठी ई-आधार पडताळणी बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर दिली आहे. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे गरजू प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळू शकेल. बनावट आयडीचा वापर करून तिकीट मिळवणाऱया एजंटच्या मनमानीला चाप बसण्यास मदत होईल. बॉट्सद्वारे होणाऱया तिकीट बुकिंगलासुद्धा आळा बसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

काय बदल होईल?

आता तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांना ई-आधारद्वारे डिजिटल पडताळणी करावी लागेल. त्यामुळे प्रवाशांना आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावे लागेल. तत्काळ बुकिंग खिडकी उघडल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांत ज्या प्रवाशांचे आयआरसीटीसी खाते आधार कार्डने लिंक आहे त्यांनाच तिकीट बुक करता येईल. या महिन्याच्या अखेरपर्यंत ई-आधार सिस्टम लागू होण्याची शक्यता आहे.