
राजापूर तालुक्यातील सागवे-नाखेरे येथे रस्त्याचे काम करताना एक पुरातन तोफ सापडली असून तिची दखल अद्याप पुरातत्त्व विभागा घेतलेली नाही. दरम्यान, आता येथील ग्रामस्थांनी ही तोफ गावातच ठेवली आहे. ही तोफ सापडल्याने आता राजापूर तालुक्याच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे.
सध्या ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून यामुळे शिवकालीन इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या तोफेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लष्करी तंत्रज्ञान समजून घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे राजापूर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वस्तू आणि ठिकाणे आजही उजेडात आलेली नाहीत. समृद्ध इतिहासाचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाने अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तूंच्या संवर्धनाची आणि पुढील संशोधन करण्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.