
खोपोलीतील के.पी. धबधब्याच्या जंगलात रिल्स बनवण्यासाठी आलेली गोरेगावातील तीन अल्पवयीन मुले आज अडकली. परतीची वाट माहीत नसल्याने रात्रीच्या अंधारात ही मुले जंगलात भरकटली. मात्र पोलिसांना माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली.
गोरेगावमध्ये राहणारी रोशन रामस्वरूप, मन्नत केमट व अभिनव वेणुगोपाळ ही मुले के.पी. धबधब्याच्या जंगलात मौजमजा करण्यासाठी आली होती. त्यांनी रिल्स बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिघेही बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधू लागले. पण अंधार आणि पाऊस यामुळे त्यांना वाट सापडेना. रोशन, मन्नत व अभिनव हे प्रचंड घाबरले. खोपोली पोलिसांना काही मुले की.पी. धबधब्याजवळ भरकल्याचे समाजताच सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले व त्यांच्या साथीदारांसह पथक जंगलात पोहोचले. तीन तासांनंतर मुलांना शोधून काढले असून सर्वांना पोलीस ठाण्यात सुखरूप आणले. त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
पोलिसांकडून आवाहन…
पावसाळय़ात अनेकांची पावले रायगड जिह्याकडे वळतात. खोपोली परिसरातही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. ही मंडळी धबधब्यांच्या ठिकाणी रिल्सच्या मोहात पडतात. त्यांनी असुरक्षित ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.