इंग्लंड गाजवण्याचे यंग टीम इंडियाचे ध्येय, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लंडनमध्ये दाखल

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील नव्या दमाचा तरुण तडफदार हिंदुस्थानी संघ बहुचर्चित इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंडमध्ये डेरेदाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन या निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत टीम इंडियातील नव्या दमाच्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी असेल. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावलेल्या टीम इंडियाला लौकिक मिळवून देण्याचे ध्येय यंग टीम इंडियाने आपल्या समोर ठेवलेय. त्यामुळे बलाढय़ इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानच्या युवांची ‘कसोटी’साठी लागणार, हे निश्चित आहे.

नवा कर्णधार आणि नवे भिडू

गिलच्या नेतृत्वाखाली 20 जूनपासून सुरू होणारा यंदाचा इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी काहीसा वेगळा ठरणार आहे. या संघात नितीश कुमार रेड्डी, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिध कृष्णा, करुण नायर, आकाश दीप, अर्शदीप सिंह अशा अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यामुळे संक्रमण अवस्थेतील टीम इंडियासाठी हा इंग्लंड दौरा म्हणजे केवळ एक कसोटी मालिका नसून भविष्यातील कसोटी संघाच्या पायाभरणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नव्या खेळाडूंना परदेशात खेळण्याचा अनुभव मिळणार आहे आणि इंग्लंडसारख्या कठीण परिस्थितीत खेळून स्वतःला सिद्ध करण्याची हिंदुस्थानी खेळाडूंना मोठी संधी असेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी आता नव्या चेहऱयांकडून ‘नवीन इतिहास’ घडविण्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

नव्या आत्मविश्वासाने इंग्लंडमध्ये ठेवले पाऊल

ऋषभ पंत, जसप्रीत बुमरा यांच्यासह साई सुदर्शन, रवींद्र जाडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज या खेळाडूंनी नव्या आत्मविश्वासाने इंग्लंडमध्ये पाऊल ठेवले आहे. फिरकीवीर कुलदीप यादव या संघासोबत रवाना झालेला दिसला नाही. काही दिवसांपूर्वी त्याचे लग्न जमल्याने तो थोडा उशिराने इंग्लंडमध्ये दाखल होईल. आकाश दीप, अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीश रेड्डी हे खेळाडू हिंदुस्थानी ‘अ’ संघासोबत याआधीच इंग्लंडमध्ये जाऊन खेळत आहेत. नायरने तर इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत सामन्यात द्विशतक ठोकून टीम इंडियातील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.