पाऊस रखडला; पेरण्या खोळंबल्या, जूनचा दुसरा आठवडा उजाडला; बळीराजाचे आकाशाकडे डोळे

काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आणि शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. फळे, भाजीपाला यांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी पाऊस रखडला असून पेरण्या खोळंबल्या आहेत. डहाणू तालुक्यासह राज्याच्या विविध भागांतील बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस वेळेवर आला नाही तर काय करायचे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

मे महिन्यात आलेल्या अवकाळी पाऊस व वादळाने डहाणू तालुक्यातील कासा, सारणी, साखरे, वाणगाव, चारोटी, धाणिवरे परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सूर्या कालव्याच्या पाण्यावर आधारित उन्हाळी भातशेती पूर्णतः पाण्याखाली गेली. उभ्या पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला होता. ऐन कापणीच्या काळात पाणथळ परिस्थितीमुळे भात काढणीस अडथळा निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर खरीप हंगामाकडून आशा असलेल्या शेतकऱ्यांवर आता पावसाच्या विलंबामुळे दुबार संकट कोसळले आहे.

आर्थिक गणित कोलमडणार
लवकरात लवकर समाधानकारक पाऊस सुरू न झाल्यास खरीप हंगाम लांबणीवर जाऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाने त्वरित उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन तसेच मदत करावी, अशी मागणी डहाणूतील शेतकऱ्यांनी केली आहे.

डहाणू तालुक्यातील अनेकांनी जूनच्या पहिल्या आठवडयातच बी-बियाणे, खते खरेदी केली आहे. मात्र पेरणीस योग्य वातावरण तयार होईपर्यंत सर्व सामग्री पडून राहणार आहे.

काही शेतकऱ्यांनी मशागत व नांगरणी केली असली तरी पेरणीला लागणारा पाऊस न आल्याने पुढची तयारी खोळंबली आहे. पाऊस नेमका केव्हा येणार याचा ठोस अंदाज हवामान खात्याने अद्यापि व्यक्त न केल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत सापडला आहे.

सध्या डहाणूत गवत पावलीचा व्यवसायही पावसाअभावी ठप्प झाला आहे. गवत आणि वीट व्यवसाय करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरकारकडे केली.