रायगडात मुसळधार; ठाण्यात संततधार, अनेक ठिकाणी झाडे कोसळली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, बाजारपेठांत पाणी

विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसला. आज दिवसभर झालेल्या पावसाने जनजीवन ठप्प करून टाकले. रायगड जिल्ह्यातील धरणे भरू लागली असून बाजारपेठांमध्ये पाणी साचले. पाताळगंगा, उल्हास, सावित्री, गाढी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर नागोठण्याच्या अंबा व रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. रायगडात पावसाने जोरदार दणका दिला असतानाच ठाणे जिल्ह्यात मात्र संततधार सुरू होती. ठाणे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. सखल भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

घरावर झाड कोसळले
तलासरी: तालुक्यातील पाटील पाडा येथे जोरदार पावसाने मनोज ठाकरे यांच्या घरावर चिंचेचे भलेमोठे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील सर्व सामानाचे अतोनात नुकसान झाले. दहा पत्रेही तुटल्याने कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ठाकरे कुटुंबाने सरकारकडे केली आहे.

नवी मुंबईत भिंत कोसळली; टेम्पो गटारात
नवी मुंबईतील वाशी प्लाझा व्यापारी संकुलाची संरक्षक भिंत सोमवारी कोसळली. तसेच या संकुलाच्या बाजूला असलेल्या गटाराचा भागही खचला. त्यामुळे एका टेम्पोसह अनेक दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेली वाहने बाहेर काढली.

भिवंडीचे मार्केट पाण्यात
आज सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने भिवंडी शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. मुंबई-नाशिक महामार्गावरील बायपास रस्ता, रानजोली नाका, येवई, सोनाळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्याशिवाय भिवंडीतील भाजी मार्केट संपूर्ण पाण्यात बुडाले. कमला हॉटेल, बाजारपेठ, अंजूर फाटा या परिसरालाही तळ्याचे स्वरूप आले होते. दिवसभर भिवंडीची वाहतूक कासवगतीने सुरू होती.

एपीएमसीमध्ये भाजीपाला पडून
नवी मुंबई : पावसाचा जोर वाढल्याने एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. व्यापारी तसेच ग्राहकांना चालणेदेखील मुश्कील झाले होते. दिवसभर पडलेल्या पावसामुळे ग्राहकांची संख्या रोडावली. त्यामुळे भाजीपाला तसाच पडून राहिला. मालाला उठाव नसल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पाऊस अपडेट

कशेडी घाटात रस्त्यावर दरड
पोलादपूर : मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील मिनी
महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडपण गावाच्या हद्दीमध्ये मातीचा ढिगारा कोसळला. त्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच लेनवरून सुरू होती. दरड कोसळल्यानंतर ती हटवण्यासाठी तब्बल एक ते दीड तास लागला, त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक पूर्ववत झाली.

विवळवेढे उड्डाणपुलावर अपघात
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विवळवेढे (महालक्ष्मी) उड्डाणपुलावर मध्यभागी पावसाचे पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन ट्रकचा अपघात झाला. त्यात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत संथ गतीने सुरू होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

लोकलमध्ये धबधबा
बदलापूर : मुंब्रा रेल्वे स्थानकातील दुर्घटना घडूनही मध्य रेल्वे प्रवाशांच्या अडचणी अजून कमी झालेल्या नाहीत. सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका प्रवाशांना बसला. बदलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या एका डब्यात चक्क धबधबा निर्माण झाला होता. या डब्याचे छत गळके असल्याने पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत होते. पाण्यामुळे कुणी सिटवर बसायलाही तयार नव्हते. लोकलमधील या धबधब्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्य रेल्वेच्या कारभाराचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले.

पळसाई धरणात तरुण बुडाला
रसायनी : एकीकडे जोरात पाऊस सुरू असतानाच पळसाई धरणामध्ये मौजमजा करण्यासाठी गेलेला तरुण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. भोला साहनी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे तो राहत होता. याबाबतची माहिती काही सामाजिक कार्यकत्यांनी पोलिसांना देताच आपत्कालीन यंत्रणेचे पथक तातडीने दाखल झाले आणि तीन तास शोध घेतल्यानंतर साहनी याचा मृतदेह सापडला.

रायगडातील धरणे 60 टक्के भरली
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोलाड लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 धरणांची पाणी पातळी वाढू लागली आहे. या घरणांमध्ये सुमारे 60 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील अलिबागमधील तिनवीरा, उमटे धरण पूर्णपणे भरले आहे. तसेच पाणीसाठ्यात वाढ होऊन विहिरी व विंधन विहिरींमधीलही पाणीसाठा वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर झाली आहे.

डंपर दुभाजकावर आदळला
ठाणे : घोडबंदरहून ठाण्याकडे भरधाव येणारा डंपर थेट दुभाजकावर आदळला असल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. डंपरचालकाचा ताबा सुटल्याने डंपर पातलीपाडा उड्डाणपुलावरील दुभाजकासह स्ट्रीट लाइट पोलवर धडकला. विद्युत कर्मचाऱ्यांनी स्ट्रीट लाइट पोलवरील विद्युत पुरवठा खंडित करून पोल रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला