हातात तिरंगा, डोळे पाणावलेले; इराणमध्ये अडकलेले 290 विद्यार्थी मायदेशी परतले, कुटुंबियांना पाहून भावूक

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत नसून एकमेकांवर घातक क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. त्यामुळे युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंधू’ केले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणनेही मोठे पाऊल उचलत हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप परतता यावे यासाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे. इराणने हवाई मार्ग खुला केल्यानंतर 290 विद्यार्थ्यांना घेऊन विमानाची पहिली खेप शुक्रवार रात्री साडे अकराच्या सुमारास राजधानी नवी दिल्लीमध्ये उतरली.

इराणच्या मशहद शहरातून हे विद्यार्थी विमानाने दिल्लीत उतरले. युद्धग्रस्त देशात सतत मरणाची भीती असलेल्या या नागरिकांनी मातृभूमी पाहताच हातातील तिरंगा फडकावत ‘हिंदुस्थान झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही विमानतळावर उपस्थित होते. त्यांना पाहताच इराणधून आलेले विद्यार्थी भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. जिवंत परत येऊ शकलो या आनंदात त्यांनी एकमेकांना मिठी मारली.

इराणहून हिंदुस्थानमध्ये परतलेले 290 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश (190) विद्यार्थी जम्मू-कश्मीरचे आहेत. काही विद्यार्थी दिल्ली, हरयाणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील आहेत. या विमानात इराणला तीर्थयात्रेसाठी गेलेले काही भाविकही होते, तर काही विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी इराणला गेले होते.

इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. या अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणले जाईल. याआधी गुरुवारी 110 विद्यार्थ्यांना घेऊन आर्मेनिया आणि दोहा मार्गे पहिले विमान दिल्लीत उतरले होते. आता आणखी एक विमान 290 विद्यार्थ्यांना घेऊन हिंदुस्थानात आले आहे.

इराणमध्ये अडकलेले 110 विद्यार्थी हिंदुस्थानमध्ये परतले, दिल्लीत उतरताच व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘घरी जायचंय, पण…’