
इंग्लंडमधील लीड्स मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 454 धावांपर्यंच मजल मारली आहे. जैसवाल (101), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी धमाकेदार फलंदाजी करत टीम इंडियाला 400 पार नेलं. परंतु साई सुदर्शन पाठोपाठ आठ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करुण नायरने चाहत्यांना निराश केलं. दोघांनाही भोपळ फोडता आला नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे करुण नायरची तब्बल आठ वर्षांनी टीम इंडियामध्ये निवड झाली. तेव्हा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेली “प्रिय क्रिकेट मला एक संधी दे” ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती. तसेच त्याच्या निवडीबद्दल चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी सर्व उत्सुक होते. 430 या धावसंख्येवर कर्णधार शुभमन गिलची विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी करुण नायर मैदानात आला. ऋषभ पंतच्या जोडीने मोठी धावसंख्या उभारण्याची त्याला सूवर्ण संधी होती. परंतु बेन स्टोक्सने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि चाहत्यांचाही हिरमोड झाला. असे असली तरी करुण नायर हा दमदार फलंदाज आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात तो धडाकेबाद फलंदाजी करेल, अशी चाहत्यांसह सर्वांना आशा आहे.