
अजित पवारांसारखा नेता राज्याला मिळाला हे राज्याचे दुर्दैवं असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच अजित पवार हे देशाचे नेतृत्व आणि ते गल्लीबोळात फिरत आहेत, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महायुतीने वचन दिले आहे, आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहीणींना 2100 रुपये दिले जाईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिलेले नाहीत. उलट आहे ते कमी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात आपण जाहीर भाषणंही केलेली आहेत. आणि आता अर्थमंत्री अजित पवार म्हणतात की, अशा प्रकारचे कुठलेही वचन किंवा आश्वासन दिलेले नाही. आता ही कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत? 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर? की एक लाख आत्महत्या झाल्यावर. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात आता कर्जमाफी करण्याची वेळ आहे. निवडणुकांच्या दोन महिन्यांपूर्वी तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती. लाडकी बहीण योजनेप्रमाणे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करतील. लाडकी बहीण, शेतकरी आणि सामान्य माणसांना फसवण्याचं यांचं धोरण आहे. काल योगा करत होते, त्यांचा संपूर्ण वेळ अशाच कामासाठी जातोय. राज्यात हे सरकार आल्यापासून गेल्या वर्षभरात दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हा आकडा जास्तही असू शकतो आणि यातल्या बहुसंख्य या आत्महत्या या कर्जबाजारीपणा, सावकारी, बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या मालमत्ता यातून झाल्या आहेत.हे काय देवेंद्र फडणवीसांना माहित नाही? योग्य वेळ कधी आहे? घरातला कर्त्या पुरुषाचा दिवा विझल्यावर तुम्ही कर्जमाफी करणार का? निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही आहात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
अजित पवारांसारखा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेत अर्थमंत्री झाला आहे. ते त्यांच्या गावातील एका साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 15 दिवस ठाण मांडून आहेत. बाकी सगळे प्रश्न वाऱ्यावर सोडले आहेत. आणि राज्यातील इतर कामासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. ठणठण गोपाळा. पण माळेगाव साखर सहकारी कारखान्याचा चेअरमन झालो तर 500 कोटी रुपये मी सरकारकडून घेऊन येईन असे अजित पवार म्हणालेत. 500 कोटी रुपये हा लहान आकडा नाहिये. कुणाचे लुटणार तुम्ही हे पैसे? तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही, लाडक्या बहीणींचे पैसे वाढवून देता येत नाहीत. पण मला माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी रुपये 24 तासांत आणतो हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात, गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते, त्यांच्या पक्षाचे नेते अजून गावातच फिरत आहेत. हे या राज्याचे दुर्दैवं की अशा प्रकारचे नेतृत्व या राज्याला मिळाले आहे असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना मनसे युतीबाबात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलत आहेत ते राजकारणात फार उशिरा आले आहेत. ठाकरे कुटुंबांना आणि ठाकरे बंधुंना मी अनेक वर्ष जवळून पाहतोय. म्हणून मला माहित आहे की काय होणार आणि काय होणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय म्हणतील यालाच महत्त्व आहे. असंच महाविकास आघाडी एकत्र येणार नाही, हे कसे काय एकत्र येतील असा प्रश्न विचारला जात होता. पण तरीही महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सरकार स्थापन केलं. राजकारणामध्ये माणसांनी नेही संयमी आणि आशावादी असायला पाहिजे. काही लोकांनी त्यांचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. नुसता उथळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो तेव्हा खुप संयम ठेवावा लागतो. मराठी माणसाच्या न्यायहक्काचा प्रश्न येतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय आपण महाराष्ट्राचे नेतृ्त्व आपण करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा आपण अभ्यास केला तर त्यातही भिन्न विचाराचे लोक एकत्र आले. त्यात कम्युनिस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजवादी हे विचारांनी वेगळे होते, त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. पण हे सगळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले. हा इतिहास राजकारणात जे तरुण आहेत त्यांनी याचा थोडासा अभ्यास करावा असेही संजय राऊत म्हणाले.