चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची धो धो धम्मालऽऽऽ, संडे असो वा मंडे आमचा रोजच फन डे

ऐतिहासिक चिरनेर गावातील आक्कादेवी बंधारा सध्या पर्यटकांना साद घालत आहे. हिरवीगार झाडी.. कधी रिमझिम तर कधी कोसळणारा धो धो पाऊस अशा वातावरणात संडे असो की मंडे पर्यटकांची येथे गर्दी होत आहे. आपल्या कुटुंबकबिल्यासह अनेक पर्यटक येथील धबधब्यावर येऊन धो धो धम्माल करीत आहेत.

चिरनेर येथे नव्याने आक्कादेवी बंधारा हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत हा धरणवजा बंधारा असून तो पावसाळ्यात दुथडी भरून वाहतो. या भागात असलेल्या डोंगरातील निसर्ग नेहमी सर्वांनाच साद घालतो. पावसाळ्यात तर हा बंधारा व परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलून निघते. मात्र पर्यटकांनी मौजमस्ती करण्यासाठी येताना आपल्या सुरक्षेचीदेखील काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यटक इथे का येतात?
आक्कादेवीच्या डोंगरात पावसाळ्यातच बिबट्या, भेकर, हरीण, रानडुक्कर, वानर, मोर आदी पक्षी-प्राणीही जंगलात स्वैरपणे विहार करताना हमखास दृष्टीत पडतात.

चिरनेर गावाजवळच हे धरण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना खाद्यपदार्थदेखील सहज उपलब्ध होत आहे. शिवाय वाहने पार्किंगसाठी जागा आहे.

पावसाळ्यातच दिसणाऱ्या हिरव्यागार निसर्गाचा आणि वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची पावले आपसूकच नकळतपणे आक्कादेवी डोंगराकडे वळतात.

हुतात्मा स्मारक, स्तंभ आणि पेशवेकालीन गणपती मंदिर
आक्कादेवी धबधब्यावर केवळ रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर ठाणे, मुंबई, नवी मुंबई भागातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. शनिवार, रविवार दोन दिवसांची सुट्टी एन्जॉय करीत असतानाच चिरनेरमधील ऐतिहासिक वास्तूही पर्यटकांना बघता येतात. 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाच्या स्मृती हुतात्मा स्तंभ व स्मारकाच्या रूपाने जिवंत आहेत. हे स्मारक तसेच पेशवेकालीन गणपतीचे मंदिर पाहण्यासाठीदेखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. चिरनेरमधील पर्यटनस्थळांमध्ये आता आक्कादेवी धबधब्याची भर पडल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.