Uttarakhand landslide – उत्तरकाशीत ढगफुटीनंतर भूस्खलन; 9 कामगार बेपत्ता, यमुनोत्री मार्ग वाहून गेला

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चार धाम यात्राही 24 तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. अशातच उत्तरकाशीतून एक मोठी बातमी समोर आली असून ढगफुटीनंतर 9 कामगार बेपत्ता झाले आहेत. उत्तरकाशीच्या सिलाई बंद येथे बारकोट-यमुनोत्री मार्गावर सुरू असलेल्या हॉटेल कामासाठी हे कामगार येथे आले होते

मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलजवळ भूस्खलन झाले आणि येथे राहणारे 8 ते 9 कामगार बेपत्ता झाले. याची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव व शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य यांनी दिली. तसेच याचा यमुनोत्री मार्गावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी सकाळच्या सुमारास भूस्खलनाची ही घटना घडली. आतापर्यंत 10 कामगारांना वाचवण्यात आले असून 9 जण अद्यापही बेपत्ता आहे. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. भूस्खलनामुळे यमुनोत्री महामार्गाचा 10-12 मीटर भागही वाहून गेला आहे. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस मदत, बचाव व शोध मोहिमेत गुंतलेले आहेत, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिली.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेबाबत ट्विट करत माहिती दिली. उत्तरकाशीच्या बडकोट तालुक्यातील सिलाई बंद भागात भूस्खलन होऊन काही कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असे ट्विट धामी यांनी केले.

दरम्यान, हवामान विभागाने रविवार आणि सोमवारसाठी उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होत पुढील 24 तासांसाठी चार धाम यात्राही स्थगित केली.

Char Dham Yatra – चार धाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित, धोक्याची घंटा वाजताच प्रशासन झालं अलर्ट