
मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नारायण राणे मर्डर करून मोठे झाले, असे म्हणत त्यांची कुडलीच मांडली. गोगावलेंच्या याच विधानाचा दाखला देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांनी खरपूस शब्दांमध्ये टीका केली. मर्डर करणारे कॅबिनेटमध्ये पंतप्रधानांच्या बाजुला बसत असतील तर त्यांच्या सुरक्षेला धोका आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
एखादा जबाबदार मंत्री केंद्राय मंत्री राहिलेल्या व्यक्तीबद्दल असे वक्तव्य करत असेल तर पोलिसांना त्यांना बोलावून जबाब घेतला पाहिजे. त्यांना नक्की काय माहिती आहे, कुणाचे मर्डर झाले याबाबत दोघांचीही चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना बोलावून घेतले पाहिजे. असे मर्डर करणारे व्यक्ती पंतप्रधानांच्या बाजुला कॅबिनेटमध्ये बसत असतील तर त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. रविवारी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
दरम्यान, भाजप सरकार आल्यानंतर अनेक प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात पळवण्यात आले. मराठी बोलणार नाही अशी दादागिरी सुरू झाली. व्हेज-नॉनव्हेजचा वाद सुरू झाला. हिंदी सक्ती लादण्यात आली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आमचा हिंदी भाषेला, भाषिकांना विरोध नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र पहिल्याच्या विद्यार्थ्यांवर हिंदी लादणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी डोके वापरावे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजप महाराष्ट्र विरोधी अजेंडा राबवत आहे. मुंबईतील सगळ्यात मोठा घोटाळा धारावीत झाला आहे. भाजप राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र, मुंबई जिंकू शकत नाही म्हणून मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली. म्हणते मुंबईतले सगळे बुलेट ट्रेनने गुजरातला न्यायला मोकळे. याला आम्ही विरोध करू, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.