
शहरी नक्षलवाद किंवा कट्टर डाव्या चळवळीतील कारवायांना आळा घालण्याच्या हेतूमुळे महायुती सरकारने आणलेले वादग्रस्त महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक सध्या चर्चेत आहे. महायुती सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले. पण विधान परिषदेत विरोधी पक्षाने त्याला जोरदार विरोध केला. आता यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा क्लास घेतला.
सोमवारी सकाळी माध्यमांनी संजय राऊत यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, काय असते डावे आणि डावी विचारसरणी असू शकत नाही का? आम्ही डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कडवट डाव्या विचारसरणीविरुद्ध लढून शिवसेना उभी केली. जगभरात डावी विचारसरणी आहे. रशिया, चीन, अर्मेनिया, युक्रेनमध्ये आजही डावी विचारसरणी आपापल्या पद्धतीने काम करत आहे.
हिंदुस्थानचे म्हणाल तर फडणवीस यांनी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे नाव ऐकले आहे का? नसेल ऐकले तर त्यांचा इतिहास पहा. डांगे यांनी या देशात डावी विचारसरणी आणली. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते. ज्यांचा पुतळा मोदींनी बसवला. त्यांनी हातात शस्त्र घेतले होते. कॉ. रणदिवे, अहिल्या रांगणेकर या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाची कामगिरी बजावली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात डावे होते, तेव्हा संघ, भाजप नव्हता.
भगतसिंह डाव्या विचारसरणीचे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले होते. सेनापती बापट डाव्या विचारसरणीचे होते. फडणवीस यांना इतिहास माहिती आहे का? अहिल्या रांगणेकर, गंगाधर रेड्डी या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, मराठी माणसाच्या लढ्यात, मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान दिले. भाजप, फडणवीस यांच्या वैचारिक पूर्वजांचे महाराष्ट्राच्या लढ्यात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान नाही. सुभाषचंद्र बोस यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ स्थापन केला. हा डाव्या विचारसरणीचा माणणारा पक्ष होता. हे त्यांना माहीत नसेल मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे. ज्या विरप्पणच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे, तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता. देवेंद्रजी अभ्यास करा, असा टोला राऊत यांनी लगावला.
हे जनसुरक्षा नव्हे, भाजप सुरक्षा विधेयक! उद्धव ठाकरे यांची चपराक
दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी आमचा संबंध नाही म्हणणाऱ्या भाजपला राऊत यांनी चांगलेच सुनावले. भाजपचा संबंध असून आरोपींचे भाजप नेत्यांच्या आसपासचे व्हिडीओ, फोटो समोर आलेले आहेत. तुम्ही डाव्यांना दोष देताय ना, मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे हे भाजपने पोसलेले डावे होते. या लोकांना जनसुरक्षा कायदा लावणार आहे का? महाराष्ट्रात कुठेही, कुणीही, कुणाला मारतोय, धरतोय. राजकीय, कार्यकर्त्यांना बाहेर फिरायला भीती वाटते. भाजपच्या गुंड टोळ्या कधी, कुणावर हल्ला करतील याचा भरवसा नाही. महाराष्ट्राचे गुंडाराष्ट्र करून टाकले आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत