
मुसळधार पावसाने मुंबईसह ठाण्यालाही चांगलेच झोडपले आहे. ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या २४ तासात ठाणे शहरात तब्बल ८६.०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात २४ तासात १२ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. पाणी तुंबण्यासह आग लागणे तसेच झाड पडल्याच्या तक्रारीची यामध्ये नोंद करण्यात आली आहे.
ठाणे शहरामध्ये आत्तापर्यंत शहरात आतापर्यंत १ हजार ९२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच ठाण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस झाला असून, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची बॅटींग सुरु आहे.
ठाण्यात पावसाचा पावसाचा जोर कायम असून मुंबईसह रायगड, कोकणातही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.