उभी पिके आडवी झाली… शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी, चार लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका; पंचनामे करण्याचे आदेश

मुंबईसह राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा  फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळे जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील उभी पिके जवळजवळ नष्ट झाली आहेत.  दरम्यान पुढील चोवीस तासांसाठी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा, कोल्हापूर घाटा परिसराला रेड अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीला समुद्रात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अतवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  विविध उपाययोजना केल्या आहेत. मुंबईत सोमवारी सकाळी 6 नंतरच्या सहा तासांत 170 मिमी पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.

समुद्रात जाणे धोक्याचे

मुंबई, शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्रात सरासरी साडेतीन मीटर ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीत समुद्र खवळलेला राहील. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. समुद्राची धूप व उंच लाटांचे तडाखे समुद्रकिनाऱयावर येण्याचा इशारा दिला आहे.