
डिजिटल युगात मुली सर्वात असुरक्षित आहेत, तंत्रज्ञान शोषणाचे साधन बनलं आहे, असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समिती आणि युनिसेफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या ”सेफगार्डिंग द गर्ल चाईल्ड’ या राष्ट्रीय परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “ऑनलाइन छळ, सायबरबुलिंग, डिजिटल स्टॉकिंग, वैयक्तिक डेटाचा गैरवापर आणि डीपफेक फोटो आज मुलींसाठी चिंतेचं मोठं कारण बनल्या आहेत. या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, पोलीस आणि अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांना समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेनं हाताळण्यासाठी विशेषतः प्रशिक्षित करणं आवश्यक आहे.”
गवई म्हणाले की, “संवैधानिक गॅरंटी असूनही देशातील अनेक मुलींना अजूनही मूलभूत हक्क आणि सन्मान नाकारला जातो. ही परिस्थिती त्यांना लैंगिक शोषण, मानवी तस्करी, बालविवाह आणि भेदभावाच्या परिस्थितीत ढकलते.” ते म्हणाले, “डिजिटल युगात धोके आता भौतिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन व्हर्चुअल जगात पोहोचले आहेत. तंत्रज्ञान संधी देत असताना, ते शोषणाच्या नवीन प्रकारांचे साधन देखील बनत आहे.”