
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने सत्ता हाती येताच शेतकऱ्यांना केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांना फसवण्याचे खेळ बंद करा, अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना झुलवत ठेवू नका, त्यांना तत्काळ कर्जमुक्त करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे आज सरकारवर कडाडले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर उद्धव ठाकरे यांनी आज जळजळीत प्रतिक्रिया दिली. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचलाय, निसर्ग कोपलाय आणि त्यात असंवेदनशील सरकारचा तुघलकी कारभार सुरू आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफीची लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे, पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी घेणार का?
जूनपर्यंत कर्जमाफी देणार असे सांगणारे सरकार जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्या जूनचा गूळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तत्काळ कर्जमुक्त करा, असे आम्ही मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून सांगत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलतेय!
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असून, कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे, असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पाच सवाल
- शेतकऱ्यांची दैन्यवस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार?
- जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का?
- पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे?
- ते हप्ते न भरता रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का?
- नव्याने कर्ज मिळणार असेल तर तेदेखील माफ होणार का?




























































